राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८व्या जयंतीनिमित्त आज त्यांचं जन्मस्थान अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी इथं शासकीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार गोपिचंद पडळकर आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, "आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन व्हावं असा प्रयत्न अहिल्यादेवींनी केला. त्यांच्या राज्यात महेश्वरसारख्या नगरीत ज्याप्रकारे त्यांनी सामान्य कुशल कारागिरांसाठी व्यवस्था केली. त्यांना खऱ्या अर्थानं आपल्या राज्यात पायाभूत सुविधा तयार करुन सामान्य शेतकऱ्याचं जीवन बदलण्याचं काम त्यांनी केलं"
अहिल्यादेवींचं राज्य पुरोगामी
पुरोगामी प्रकारचं त्यांचं राज्य होतं. हुंडाविरोधी धोरण त्यांनी स्विकारलं, दारुबंदीची हाक दिली. त्याकाळात क्षयरोगावर नियंत्रणासाठी अखिल भारतातील वैद्यांना एकत्रित करुन क्षयरोगावरी उपचार आणि औषध तयार करण्याचं काम त्यांनी केलं होतं. जंगलतोडी विरोधातील त्यांची भूमिका होती. पण अहिल्यादेवींनी स्वतःची तिजोरी आणि राज्याची तिजोरी वेगळी ठेवली. राजमातांनी देशभरातील मंदिरांचा जिर्णोद्धार केला तो केवळ आपल्या तिजोरीतून केला, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
अहिल्यादेवी नसत्या तर....
"मुघलांनी हिंदुंना देवळांवरुन आव्हान दिलं होतं पण त्यावेळी राजमाता पुढे आल्या आणि त्यांनी सर्वांना वाचवण्याचं काम केलं. तसेच जिर्णोद्धार करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं. त्या नसत्या तर काशीही दिसली नसती, त्या नसत्या तर या ठिकाणी शिवाची मंदिरंही दिसली नसती, त्या नसत्या तर दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आमचा धर्मही जिवंत आहे तो ही दिसला नसता," असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
अहमदनगरच्या नामांतराची केली मागणी
त्यामुळं या जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं पाहिजे ही जी मागणी होत आहे. त्याप्रमाणं मी देखील मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की, आपण तुमच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर, धाराशीव तयार केलं आहे. आता तुमच्याच नेतृत्वात अहिल्यानगर झालं पाहिजे. मला विश्वास आहे की मुख्यमंत्री हे छत्रपतींचे मावळे आहेत तर अहिल्यानगर हे नाव होणारचं. तुम्ही याची चिंता करण्याचं काही कारणचं नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना नामांतराची मागणी केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.