अहमदनगर : वृक्ष तोडल्यास ५० हजार दंड

अहमदनगर महापालिका क्षेत्रात कार्यवाही अधिकाऱ्यांची बैठक
Tree Cutting
Tree Cuttingesakal

अहमदनगर : महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष शंकर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. राज्य सरकारच्या आदेशानुसार सुधारित वृक्ष कायद्याची नगर शहरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार बेकायदा वृक्षतोड केल्यास प्रतिवृक्ष ५० हजार रुपये दंड करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्र शासन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम १९७५ या कायद्यात सुधारणा करून अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश महापालिकेला दिले होते. तसेच या सुधारित कायद्याची अंमलबजावणी अहमदनगर महापालिका कार्यक्षेत्रात करण्यात यावी व बेकायदा वृक्षतोड केल्यास संबधितावर प्रतिवृक्ष ६० हजार दंड आकारावा, अशी मागणी उपमहापौर गणेश भोसले आणि येथील हरियाली संस्थेच्या वतीने करण्यात आली होती.

या सुधारणा परिपत्रकातील १३ क्रमांकाच्या मुद्द्यानुसार बेकायदा वृक्ष तोड केल्यास जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे आदेश होते. या मुद्द्यावर चर्चा करून अहमदनगर शहरात यापुढे बेकायदा वृक्षतोड झाल्यास ७ वर्ष वयाच्या पुढील प्रतिवृक्ष ५० हजार रुपये दंड संबंधितांकडून आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक वृक्ष प्राधिकरणाने दर पाच वर्षाने किमान एकदा वृक्ष गणना करावी. नविन प्रकल्पांचे आरेखन करताना कमीत कमी झाडे तोडण्यात यावीत, या अनुषंगाने पर्यायी विकल्पांचा विचार केला जावा, वृक्ष कर हा वृक्ष लागवड व संगोपनासाठीच खर्च करावा, अशा व इतर १ ते १३ सुधारणांवर बैठकीत चर्चा झाली. सुधारित कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी शहरात करण्याचा निर्णय घेऊन ठराव मांडण्यात आला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.

बैठकीला उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक महेंद्र गंधे, हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर, तुलसीराम पालिवाल, मनपा शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक जुबेर पठाण, बांधकाम विभागप्रमुख सुरेश इथापे, सामाजिक वनीकरण विभागाच्या सहाय्यक विभागीय अधिकारी पठाण, मनपाचे प्रसिद्धी प्रमुख शशिकांत नजान आदी उपस्थित होते.

दुर्मिळ वृक्षांची करणार जपवणूक

सुधारित कायद्यानुसार ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे हेरिटेज ट्री (प्राचीन वृक्ष) तोडण्याची परवानगी देण्यात येणार नाही. तथापि, अपवादात्मक परिस्थितीनुसार वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिल्यास त्याबदल्यात नुकसान भरपाई वृक्षारोपण म्हणून तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या वयाच्या संख्येएवढी झाडे लावून ७ वर्षांपर्यंत संगोपन करणे बंधनकारक राहणार आहे.

यंदा लावणार ५ हजार वृक्ष

या वर्षी पावसाळ्यात नगरमध्ये १२ फूट उंचीच्या ५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या कामासाठी फेरनिविदा प्रकाशित करून तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना उद्यान विभागास देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या वृक्षतोडीबाबत आलेल्या अर्जावर विचारविनिमय करून बैठकीत निर्णय घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com