अकोले : तालुक्यात वळण बंधारे होतीलच; मात्र प्रवरेतील प्रोफाइल वॉल बांधून तालुक्यात पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक असताना, जे काम होणार आहे. त्याबाबत तालुक्याचे लोकप्रतिनिधी बोलतात. त्यापेक्षा प्रोफाइल वॉल बांधून, तसेच सरकारदरबारी आपले वजन वापरून तालुक्याला पाणी उपलब्ध करून देणार आहेत की नाही, असा सवाल माजी आमदार वैभव पिचड यांनी उपस्थित केला आहे.
पत्रकारांशी बोलताना पिचड म्हणाले, ""बाळासाहेब विखे पाटील, मधुकरराव पिचड यांनी पाणी कोकणात वाहून जाऊ नये म्हणून प्रवरेत वळवून, त्याचा फायदा जिल्ह्यासह दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्याला मिळावा म्हणून वळण बंधारे करण्याचे ठरविले.
तत्कालीन सरकारने त्याला मंजुरी दिली होती. यापुढेही तो विषय सरकारी पातळीवर होणार आहेच; मात्र प्रोफाइल वॉलसाठी 12 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. माजी मंत्री पिचड यांनी त्यास मंजुरीदेखील घेतली आहे. केंद्रीय जल आयोगाने त्यास मान्यता दिली आहे. मग तालुक्याच्या आमदारांनी जलसंपदा विभाग व सरकारदरबारी आपले वजन वापरून हा प्रश्न सरकारकडे आग्रही भूमिका घेऊन सोडविणे आवश्यक आहे.''
""कालव्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी म्हाळादेवी पूल, पिंपरकणे पूल ही कामे मार्गी लागणे आवश्यक आहे. युती सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेतल्यामुळे पुलाचे काम झाले; मात्र वर्षभरापासून हे काम बंद आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता असून, तो आणून काम सुरू होणे आवश्यक आहे,'' असेही पिचड यांनी स्पष्ट केले.
तालुक्यात पाणी अडविण्यासाठी साइट उपलब्ध असून, त्याचे प्रस्ताव सरकारदरबारी पाठवून मंजुरी आणणे आवश्यक आहे. मात्र, त्याबाबत उदासीनता आहे. किमान एखादा बंधारा तरी मंजूर करा,'' असा टोमणा पिचड यांनी लगावला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.