श्रीगोंदे (अहमदनगर) : कुकडीच्या आवर्तनास होत असलेल्या विलंबामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी होरपळत आहे. तालुक्यातील नेते याप्रश्नी राजकारण करून श्रेयाची लढाईत गुंतले आहेत. पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांनी कणखर भूमिका घेत एकत्र यावे, अन्यथा कुकडीच्या पाण्यासाठी एकटीच लढणार असल्याची घोषणा महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी केली.
पत्रकार परिषदेत नागवडे म्हणाल्या, कुकडीच्या पाण्याबाबत 'स्टंटबाजी' न करता नेतेमंडळींनी ठोस भूमिका घेतली पाहिजे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना नेतेमंडळी पत्रकबाजी करण्यात दंग असतात. हॅलो, पाणी सोडा, मी पाणी सोडले, मी निवेदन दिले. त्यामुळेच पाणी सुटले असा श्रेयवाद करण्यात काही मंडळी धन्यता मानतात. कुकडीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी एकत्र येण्याचे आवाहन करते. नागवडेंच्या नेतृत्वाखाली लढण्यास कुणाला कमीपणा वाटत असल्यास जो कुणी याप्रश्नी पुढे त्यांच्यासोबत आम्ही राहू. तसेही न झाल्यास कोणीही सोबत आले नाही तरी कुकडीच्या प्रश्नावर एकटी लढण्याचीही माझी तयारी आहे.
नागवडे म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी आम्ही प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करीत आहोत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने कोविड सेंटरसाठी शहरातील छत्रपती महाविद्यालयात जागा उपलब्ध करून देणार आहोत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.