नोकरी गेली तेल लावत...तेलामुळेच या तरूणाने दिली बेरोजगारांना नोकरी

shevgaon
shevgaon

शेवगाव (नगर) : रसायनमुक्त खादयतेल मिळण्यासाठी शेवगाव येथील दोन उच्च शिक्षित तरुणांनी नोकरीला फाटा देवून लाकडी घाण्यावरील तेल निर्मिताचा उदयोग सुरु केला आहे. शहरातील चांगल्या हुद्दयाची नोकरीसोडून महेश बोडखे व महेश गोरे या दोन यंत्र अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या तरुणांनी शेवगाव सारख्या ग्रामीण भागात हे धाडसी पाऊस उचलले असून त्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या तेलास अल्पावधीत लोकप्रियता मिळाली आहे. 

तालुक्यातील खरडगाव येथील रहिवाशी असलेले बोडखे व चापडगाव येथील रहिवाशी असलेले गोरे हे यंत्र अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून पुणे येथे नामांकीत कंपनीत नोकरीत होते. मात्र नोकरी सोडून  ग्रामीण भागात स्वत:चा काही तरी व्यवसाय सुरु करावा अशी त्यांची इच्छा होती. खादय तेलातील रिफाईंड आणि डबल रिफाईंड या प्रकारात मोठया प्रमाणात रसायने वापरत असल्याने त्याचा माणसाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होवून ह्रदयाशी संबंधित रक्तदाब, मधूमेह, लठ्ठपणा असे विकार उदभवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लाकडी घाण्यावरील रसायन विरहीत निर्भेळ तेल हे दररोजच्या आहारात वापरणा-यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

त्याबाबत लोकांमध्ये जागरुकताही निर्माण झाली आहे. त्यामुळे लाकडी घाण्यापासून तेल निर्मिती व्यवसायात उतरण्याचे या दोन्ही अभियंत्यांनी उतरवण्याचे ठरवले. त्यानुसार शेवगाव शहरातील आखेगाव रस्त्यावर जागा भाडयाने घेवून स्वत:च्या वेदामृत या कंपनीची जुलै २०१९ मध्ये स्थापना केली. तेलनिर्मितीसाठी लागणारे करडई, सुर्यफूल, शेंगदाणा, तीळ, जवस, मोहरी या तेलबिया ग्रामीण भागात सहजासहजी उपलब्ध होतात. त्यामुळे कच्चा मालासाठी फारशी धावपळ करावी लागत नाही. शिवाय तेल निर्मीती नंतर तयार होणारी पेंड  ग्रामीण भागात पक्षू खादय म्हणून शेतक-यांना कमी भावात उपलब्ध होते.  

वर्षभरात तेलाची गुणवत्ता व दर्जा पाहून ग्राहकांनी त्यांच्या विविध प्रकारच्या तेलास चांगली पसंती दिली. खादयतेलाबरोबरच विविध आयुर्वेदीक उपचारासाठी लागणारे तीळ, मोहरी, बदाम, अक्रोड, जवस, का-हळ या तेलांची सुध्दा त्यांनी निर्मिती केली. यासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे घाणे तामिळनाडू येथून उपलब्ध केले. तर करडई आणि सुर्यफुलासाठी लागणारे मशीन स्वत:च्या आभियांत्रिकी शिक्षणाच्या अनुभवावरुन स्वत: तयार केले.

आतापर्यंत त्यांनी वैदामृत या ब्रँन्डने अनेक प्रकारच्या तेलांची निर्मिती केली असून त्यांच्या या व्यवसायामुळे पाच ते दहा जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शहरातील अनेक ग्राहक रायायनिक रिफाईंड तेलाऐवजी येथील लाकडी घाण्यावर तयार केलेल्या तेलास पसंती देत असून त्यांची आर्थिक उलाढाल मोठया प्रमाणावर वाढली आहे. याचा उभारणीसाठीचा खर्च ३० लाख, उत्पन्न दरमहा तीन लाख रुपये, उत्पादन खर्च वजा जाता दरमहा निव्वळ नफा एक लाख रुपये, दरमहा सर्व प्रकारच्या तेलांचा खप दोन हजार लीटर, पाच ते दहा जणांना या पासून रोजगार निर्मीती मिळाली आहे. 

वैदामृत नँचरल सायन्सचे संचालक महेश बोडखे म्हणाले, तरुणांनी शिक्षणानंतर नोकरीसाठी शहराकडे धाव घेण्याची गरज नाही. सध्या रसायनमुक्त भेसळ विरहीत व नैसर्गिक जीवन जगण्याकडे वाढत असलेला कल लक्षात घेवून त्या अनुषंगाने शेती आणि पुरक व्यवसाय ग्रामीण भागात कसा उभा करता येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

 
                                                                                                           

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com