संगमनेर ः बांधावर खते उपलब्ध करून देण्याचे सरकारचे आश्वासन हवेत विरले आहे. खरिपाच्या सुरवातीलाच खतासाठी हेलपाटे मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पीकवाढीसाठी सर्रास वापरण्यात येणाऱ्या युरियाच्या खरेदीसाठी सहकारी शेतकी संघ व खासगी कृषी निविष्ठा विक्रीच्या दुकानांपुढे शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
तालुक्यात युरिया खताची टंचाई जाणवत अाहे. त्यास कृषी विभागच कारणीभूत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संतोष रोहम यांनी केला आहे. युरियासाठी शेतकरी वणवण फिरत असताना, शेतकी संघासमोरच युरियासाठी होणाऱ्या गर्दीचा खुलासा कृषी विभागाने करावा, अशी मागणी केली आहे. आघाडी सरकार शेतकऱ्यांचा आणखी किती अंत पाहणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. मागील 15 दिवसांपासून तालुक्यात खते उपलब्ध नाहीत.
हेही वाचा - गाडिलगावात भैरवनाथाच्या साक्षीने सुरू होता जुगार
कृषी विभागाने खते आगाऊ उपलब्ध करणे आवश्यक असताना, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कृषी विभागाला निवेदन देऊनही फारसा उपयोग झाला नाही. शेतकी संघातून ठरावीक व मर्जीतील शेतकऱ्यांना खते दिली जात असल्याचा आरोप रोहम यांनी केला.
कृषी विभागाने तालुक्यात युरिया खताच्या संदर्भात सविस्तर खुलासा करून, खताची उपलब्धता करून द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा रोहम यांनी दिला आहे.
तालुक्याला युरियाचा 3420 मेट्रिक टन कोटा मंजूर असून, त्यापैकी 2140 मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. खतांसाठी होणारी गर्दी टाळण्याकरिता कृषी सहायक, पर्यवेक्षकांची नियुक्ती खतविक्री दुकानांवर केली आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली टोकन देऊन खतांचे वाटप केले जात आहे. लवकरच खते उपलब्ध होतील, अशी ग्वाही उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.