श्रीगोंदे (अहमदनगर) : पाण्याची चोरून विक्री करण्यासाठी घोड धरणाच्या दरवाजातून गळतीचा भयानक प्रकार घडला. यात कर्मचाऱ्यांसह शेतकरीही सामील असल्याची चर्चा आहे. दरम्यान, हा प्रकार 'सकाळ'ने समोर आणल्यानंतर यांत्रिकी विभागाच्या मदतीने सोमवारी ही गळती बंद करण्यात आली. मात्र, यादरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.
उषःकाल होता होता कोरोनाची काळी रात्र आली; महापालिकेची दोन कोविड सेंटर सुरू
घोड धरणातून उजव्या कालव्याद्वारे शिरूर (जि. पुणे) व डाव्या कालव्याद्वारे श्रीगोंदे व कर्जत (जि. नगर) येथील क्षेत्र ओलिताखाली येते. धरणातून उन्हाळी हंगामात तीन आवर्तने होतील, अशी अपेक्षा होती. त्यातील पहिले आवर्तन काही दिवसांपूर्वीच संपले. मात्र, दोन दिवसांपूर्वी डाव्या कालव्याच्या दरवाजाला गळती सुरू झाली. काही कर्मचारी व शेतकऱ्यांनी संगनमताने ही गळती केल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी रात्री दरवाजातून पाणी सोडण्यात आले. मात्र, ते जास्त सुटल्याने थेट हंगेवाडीच्या शिवारात आले आणि बोभाटा झाला. त्यामुळे घाईने शनिवारी सकाळी पाणी बंद करण्याची लगबग झाली. मात्र, गळती कायम राहिली. त्यामुळे गळतीचे पाणी कालव्यात बंद करून ते नदीला सोडण्यात आले.
सध्या दहा क्यूसेकने गळतीचे पाणी वाहत होते. हा प्रकार 'सकाळ'ने समोर आणल्यानंतर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी यात जातीने लक्ष घातले. त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यातच 'घोड'चे उपअभियंता दिलीप साठे यांनी बेलवंडी पोलिसांकडे तक्रार दाखल करीत, या गळतीप्रकरणी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. यात त्यांनी घोड धरणावरील कर्मचाऱ्यांसह जो कोणी दोषी आहे, त्याची चौकशी करावी, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
'घोड'च्या अधिकाऱ्यांनी या गळतीबाबत आमच्याकडे तक्रार दिली. त्यानुसार तेथील काही कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलाविले आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन, यात दोषी असलेल्यावर योग्य कारवाई करू.
- संपत शिंदे, पोलिस निरीक्षक, बेलवंडी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.