
शेवगाव शहरात ग्रामपंचायत असताना तीन-चार दिवसांआड नळाला पाणी येत होते. मात्र, पालिका झाल्यापासून नागरिकांना वेळेवर व पुरेसे पाणी मिळत नाही.
शेवगाव : जायकवाडी धरणात मुबलक पाणी असूनही, शेवगाव शहराला 12 दिवसानंतर पिण्याचे पाणी येते. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन व सत्ताधारी पक्षाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंडन आंदोलन करण्यात आले. शहरातील क्रांती चौकात काल (सोमवारी) झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व वंचित आघाडीचे प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांनी केले.
हेही वाचा - महादेव जानकरांना दोन खासदार, ५० आमदार निवडून आणायचेत
शेवगाव शहरात ग्रामपंचायत असताना तीन-चार दिवसांआड नळाला पाणी येत होते. मात्र, पालिका झाल्यापासून नागरिकांना वेळेवर व पुरेसे पाणी मिळत नाही. सध्या जायकवाडी धरण 100 टक्के भरलेले असतानाही 10 ते 12 दिवसांतून एकदा पाणी मिळते. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंडन आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
वंचितचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, शहराध्यक्ष विशाल इंगळे, संघटक शेख सलीम जिलानी, वंचित बहुजन आघाडी नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश खरात, भाऊराव सरसे, कचरू मगर यांनी प्रातिनिधीक स्वरूपात मुंडन केले.