शिर्डी : एकमेकांविरोधात निवडणुका लढवून नंतर केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीचा कारभार जनतेने पाहिला. गैरव्यवहारांची संख्या आणि व्याप्ती एवढी मोठी, की मंत्री आणि अधिकारी एकापाठोपाठ एक तुरुंगात गेले. सत्तेत असताना तोल गमावलेल्या महाविकास आघाडीला सत्ता गमावल्यानंतर हुडहुडी भरली नाही तरच नवल. ही आघाडी फार काळ टिकेल असे वाटत नाही, असे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
गेल्या दोन दिवसांत त्यांनी शिर्डी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी दिल्या. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. ‘आनंदाचा शिधा’चे वितरण आणि विकासकामांचा प्रारंभ केला.
अहमदनगर येथे चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या व्यापा-यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. वरिष्ठ पोलिस आणि महसूल अधिका-यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दौ-यात ‘सकाळ’शी बोलताना त्यांनी वरील मतप्रदर्शन केले. यावेळी त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे ः
प्रश्न : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वादग्रस्त वक्तव्ये करण्याची स्पर्धा सुरू असल्याचे चित्र दिसते. आपण मात्र कटाक्षाने या चिखलफेकीपासून दूर असता. सध्या जे काही सुरू आहे, त्याबाबत आपले मत काय आहे?
उत्तर : सत्ता गेल्याच्या वैफल्यातून अशी वादग्रस्त वक्तव्ये केली जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील अशा वक्तव्यांपासून नेहमीच दूर असतात. माझ्यापुरते बोलायचे, तर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून केली जाणारी बेताल वक्तव्ये म्हणजे राजकारण नव्हे. ते आणि त्यांचा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नव्हे, हे वास्तव ते जेवढ्या लवकर लक्षात घेतील, तेवढे त्यांच्या दृष्टीने बरे राहील.
प्रश्न : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनंतर राज्यात सर्वाधिक दौरे करणारे मंत्री म्हणून आपली ओळख आहे. आपण सध्याच्या महाराष्ट्राकडे कसे पाहता?
उत्तर : टिंगल-टवाळी आणि बेताल बडबड म्हणजे राजकारण नव्हे. हवामानातील चिंताजनक बदल हे जगाप्रमाणे महाराष्ट्रासमोरील मोठे संकट आहे. राज्यात सलग पंधरा ते वीस दिवसांपासून अवकाळी पाऊस होतोय. उष्णतामान कल्पनेहून अधिक वाढतेय.
उष्माघाताचे बळी जात आहेत. पिके कशी टिकवायची आणि शेती कशी करायची, याचे उत्तर कसे शोधायचे, यावर जागतिक पातळीवर मंथन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अशा संकटाकडे जगाचे लक्ष वेधत आहेत. पीकविमा योजनेच्या निकषांत बदल करावे लागतील. या योजना शेतीभिमुख कराव्या लागतील.
शिवसेना-भाजप युतीच्या सध्याच्या सरकारने केवळ एका रुपयात पीकविमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. हवामानातील बदल आणि त्याचे शेतीवरचे दुष्परिणाम, ही गंभीर समस्या आहे. या संकटकाळात शेतक-यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
खडीचा पुरवठाही वाजवी दरात
नवे वाळू धोरण कसे असेल आणि खडीचा पुरवठा कधी पूर्ववत सुरू होईल, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे, याची मला कल्पना आहे. मूठभर संख्येने असलेल्या वाळू आणि खडीमाफियांनी या क्षेत्रावर ताबा निर्माण केला होता. पर्यावरणाची हानी आणि गुन्हेगारी वाढली होती. आता येत्या एक मेपासून सहाशे रुपये ब्रास एवढ्या स्वस्त दराने वाळूची विक्री सुरू होईल. लोकांना सर्वच प्रश्नांची आपोआप उत्तरे मिळतील. खडीचा पुरवठादेखील वाजवी दराने सुरू होईल, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.