शिर्डी-अहमदनगर मार्गावर मृत्यूचे तांडव

उत्तरेतील मंत्री अन् लोकप्रतिनिधींचे मौन; केंद्र सरकारला जाग येणार का
Shirdi Ahmadnagar road
Shirdi Ahmadnagar roadSakal

शिर्डी - दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा आणि वाहतुकीचा सर्वाधिक ताण असलेल्या सावळीविहीर ते अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाचे तीन तेरा वाजलेत. गेल्या वीस वर्षांपासून खड्ड्यांचा आणि अपघातांच्या मालिकांचा शाप भोगीत असलेल्या या रस्त्याचे काम पुन्हा अर्धवट स्थितीत बंद पडले. धोकादायक झालेल्या या रस्त्याने काल (ता. १५) चार निरपराध साईभक्तांचे बळी घेतले. पावसाळा तोंडावर आला असून, खबरदारी न घेतल्यास बळींची संख्या वाढत जाणार आहे. दुर्दैवाने उत्तरेतील लोकप्रतिनिधी आणि मंत्री मात्र मूग गिळून बसलेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय हरित लवादाने स्टोन क्रशर चालविण्यासाठी कायमस्वरूपी परवानगी घ्यावी, असे आदेश दिलेत. या ठेकेदाराकडे तशी परवानगी नसल्याने त्याचे स्टोन क्रशर बंद करण्यात आले. मंत्रालयातून तातडीने परवानगी मिळाली, तर क्रशर आणि बंद पडलेले काम सुरू करता येईल. गमतीचा भाग असा की एवढे मोठे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे खडीचा साठा देखील नाही. ठेकेदार आणि पोटठेकेदारांचा वीस वर्षांपासून सुरू असलेला खो-खोचा खेळ पुन्हा रंगात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला खोदलेला भाग बुजवा, असे आदेश दिलेत. त्यावर ठेकेदाराने क्रशर बंद असल्याने खडी नाही. मग काम कसे करायचे, असा प्रतिप्रश्न उपस्थित करून धोकादायक स्थितीत काम बंद केले. ठिकठिकाणी खोदकाम करून ठेवल्याने रस्त्यावरील अपघात वाढलेत. एकट्या गुहा (ता. राहुरी) परिसरात गेल्या पाच महिन्यांत बारा प्रवाशांचे बळी गेलेत. हरित लवादाची परवानगी आणि रस्त्याचे काम कधी सुरू होईल, हे आता कुणीही सांगू शकत नाही.

मुळातच ठेकेदाराने ७५ किलोमीटर लांबीचे हे ४३१ कोटी रुपयांचे काम २७ टक्के कमी दराने म्हणजे ३१३ कोटी रुपयांना घेतले. त्याचवेळी जाणकारांनी या रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकत नाही, असा दावा केला होता. दुर्दैवाने तो खरा ठरतो आहे. कमी दराने काम घ्यायचे नंतर अर्धवट स्थितीत बंद ठेवून अधिक दराची मागणी करायची. ती राज्यकर्त्यांनी हळूहळू पूर्ण करीत न्यायची, हा जुनाच प्रकार येथे सुरू आहे. त्यात निरपराध जीवाला मुकत आहेत.

बळी घेणारा महामार्ग

सावळीविहीर ते अहमदनगर हा देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या शिर्डीला जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. राज्य सरकारकडे असताना या रस्त्याचा सलग वीस वर्षे खेळखंडोबा झाला. आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचे काम अर्धवट स्थितीत बंद पडले. स्थानिक रहिवाशांचे आणि साईभक्तांचे बळी घेणारा भंगार राष्ट्रीय महामार्ग, अशी नवी ख्याती त्याने प्राप्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com