अण्णांची एवढी धास्ती? देवेंद्र फडणवीसांचा तो व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

anna hajare
anna hajare

अहमदनगर ः सध्या देशात शेतकरी आंदोलन हा एकच मुद्दा माध्यमांच्या केंद्रस्थानी आहे. कारण दररोज काही ना काही वादग्रस्त घटना घडत आहेत. त्यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला धारेवर धरले होते. परंतु माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दोनदा राळेगणची वारी करून अण्णांना उपोषणापासून परावृत्त केलं. ही आनंदवार्ता सांगत असताना असताना एका व्हिडिओमुळे त्यात मिठाचा खडा पडला आहे. त्यामुळे फडणवीस तसेच अण्णांविरोधात सोशल मीडियात मीम्स बनवले जात आहेत, ट्रोलही होत आहेत. 

त्याचं झालं असं ः राळेगणसिद्धी येथे २९ जानेवारीला अण्णांनी उपोषण स्थगित केल्याची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी केंद्रीय कृषीराज्य मंत्री कैलास चौधरी, विरोधी पक्ष नेते फडणवीस, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते आदींसह भाजपची मंडळी उपस्थित होती. त्यावेळी ही घटना घडली आहे.

देवेंद्र फडणवीस हे माध्यमांना धीटाईने सामोरे जाणारे नेते आहेत. त्यांच्यासाठी कोणताच प्रश्न अडचणीचा नसतो. उलट ते विरोधकांची बोलती बंद करण्यात पटाईत आहेत. मात्र, मीडियामुळेच त्यांची अडचण झाल्याचे दिसले. एका पत्रकाराच्या प्रश्नामुळे त्यांनी पत्रकार परिषदच गुंडाळली. त्यामुळे सोशल मीडियातून त्यांच्या टीका होत आहे. यात अण्णांनाही भरडले जात आहे.

एका पत्रकाराने अण्णांना प्रश्न विचारला, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झालेल्या नाहीत. सरकारने ते स्वीकारण्याबाबतचा एक ड्राफ्ट दिला आहे. त्यासाठी समिती नेमली जाणार आहे. त्यामुळे हे केवळ आश्वासन आहे. त्यामुळे पुन्हा एक आश्वासन मिळाल्याने अण्णा तुमची विश्वासाहर्ता कायम राहील...अशा आशयाचा तो प्रश्न होता.

नेमकी याच प्रश्नाने वर्मावर बोट ठेवले. या प्रश्नानंतर कृषीमंत्री चौधरी अण्णांकडे तसेच फडणवीस यांच्याकडे पाहतात. फडणवीस हेही अण्णांकडे पाहतात. आणि समजला तुमचा प्रश्न. मला असं वाटतं प्रश्नोत्तराची गरज नाही, असे म्हणत ते अण्णांकडे पाहत उठू लागतात. अण्णा म्हणतात, आं... असा संदर्भ असलेला तो व्हिडिओ आहे.

साधारणपणे २४ सेकंदाच्या या व्हिडिओने अण्णा आणि देवेंद्रजी यांच्या सोशल मीडियातून टीका होत आहे. मीम्स बनवले जात आहेत. आता का बोलती बंद झाली...अब बोलो कोई...गंडवलं अशा आशयाची ती मीम्स आहेत.

अण्णांनी प्रश्नच ऐकला नाही...

अण्णा हजारे यांना वृद्धापकाळाने थोडेसे कमी ऐकू येते. त्यामुळे ते दुसऱ्यांना मोठ्याने बोलण्याचा आग्रह करतात. त्यांना पत्रकाराने विचारलेला प्रश्न ऐकू आलाच नाही, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळे अण्णांवर होणारी टीका चुकीची आहे. अण्णा कोणताच प्रश्न टाळत नाही. उलट अण्णांच्या उत्तराने कदाचित सरकारची अडचण झाली असती. त्यामुळेच त्यांना रोखण्यात आलं असावं असं त्यांचे म्हणणे होते.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com