अकोला : साहित्यिकांचा उदगीरच्या 'साहित्य संमेलनात' डंका

उदगीर येथे भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी येथे संपन्न झालेले संमेलन अकोल्यातील सारस्वतांनी गाजवले
Akhil bharatiya sahitya sammelan udgir
Akhil bharatiya sahitya sammelan udgirsakal

अकोला : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. संमेलनाचे उद्‍घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी येथे संपन्न झालेले संमेलन अकोल्यातील सारस्वतांनी गाजवले.

कविवर्य सुरेश भट गझलकट्ट्यावर २३ एप्रिल रोजी पहिल्या सत्राच्या गझल मुशायऱ्याला निलेश कवडे, अमोल शिरसाट, मंगेश गजभिये, संदीप वाकोडे आणि सतीश मालवे यांचा सहभाग होता. आपल्या दमदार सादरीकरणाद्वारे अकोलेकर गझलकारांनी मुशायरा उंचीवर नेला. ‘पुस्तक नव्हते, दप्तर नव्हते दिसते का निकाल केवळ टक्केवारी दाखवतो’ या शेराच्या माध्यमातून अमोल शिरसाट यांनी शिक्षण क्षेत्रातील वास्तव मांडले. मंगेश गजभिये यांनी, ‘वाचता आला न त्यांना स्पष्ट माझा चेहरा वाचणारा एकही माणूस नव्हता जाणता....’ या शेरातून माणसाच्या अव्यक्त भावनांना न्याय दिला.

‘ऊन यामुळे लागत नाही त्याला तो आईच्या पदराखाली आहे’ आईच्या प्रेमाचे गुणगान करणारा सतीश गुलाबसिंह मालवे यांचा शेर रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. ‘जिंकणे वा हारणे हा निकष नाही,`झुंजती त्यांचेच मी गुणगान करतो...’ मानसाच्या लढा वृत्तीचे महत्व संदीप वाकोडे यांनी आपल्या शेराच्या माध्यमातून मांडले. ‘सुख माझ्या प्रेयसीप्रमाणे भेटते मला सारखे जायला उठते अन् मी बस म्हणतो...’ या निलेश कवडे यांच्या शेराला रसिकांनी विशेष पसंती दर्शवली. कविकट्ट्यावर निलेश देवकर, अनिकेत देशमुख डॉ. सतीश खरात यांनी उल्लेखनीय सहभाग घेतला ‘सांग सखे?’ या निलेश देवकर यांच्या कवितेतील, ‘तोच रस्ता, तेच गाव, पुन्हा खावून तोच भाव, तेच धारण करून नाव, सांग सखे येशील का?’ या ओळी विशेष भाव खाऊन गेल्यात.

अनिकेत जयंतराव देशमुख यांनी ‘वऱ्हाडीचं गोंदन’ कवितेमधून ‘अभिजात पुराव्याले वऱ्हाडीचं रे कोंदण, माया वऱ्हाडी बोलीचं कायजावर गोंदन’ अशा शब्दात मायबोली वऱ्हाडीचे गुणगान केले. डॉ. सतीश खरात यांच्या ‘कर जुळोनी हेच मागणे’ या कवितेमधील ‘लवून हसली फांदीन् फांदी पानां फुलांचा नाद खुळा’, ‘गंधाळलेल्या पहाटवेळी दवांत भिजला चिंब मळा’ अशा ओळींमधून रसिकांच्या काळजाला साद घातली. ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सन्माननीय सदस्य अकोल्याचे डॉ. गजानन नारे हे विचारपीठावर उपस्थित होते. परिसंवादामध्ये डॉ. स्वाती दामोदरे आणि डॉ. किरण वाघमारे, ‘निमंत्रितांचे कविसंमेलन’ मध्ये ज्येष्ठ कवी सुरेश पाचकवडे तर निमंत्रितांचे बाल कविसंमेलनात मूर्तिजापूरचे कवी रविंद्र जवादे यांनी निमंत्रित कवी म्हणून कविता सादर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com