अकोला ः अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व संस्था यांनी परस्पर शेकडो शेतकऱ्यांच्या कर्चाचे पुनर्गठण केले. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले. त्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी योजनेचा लाभ द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गुरुवारी (ता. 30) आक्रोश यात्रा काढून जिल्हाधिकारी कार्यालयात चटणी-भाकर खाऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळाला. त्यांना अत्यल्प कर्जवाटप होत आहे. त्यांना 20 ते 25 हजार रुपये वाढीव कर्ज उपलब्ध करून द्यावे. ज्या संस्थेमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते, ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली, अशांवर तातडीने कारवाई करून सेवा सहकारी संस्था बरखास्त करावी, कर्जमाफी योजनेच्या कर्ज वाटपात खुप दिरंगाई होत आहे.
अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
ती तातडीने सुलभ करण्यात यावी, बाळापूर व तेल्हारा तालुक्यात शेतकऱ्यांच्या नगदी पीक समजल्या जाणाऱ्या मुंग पिकावर अज्ञात रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने शेतीचा पंचनामा तातडीने करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, या मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर, तालुकाध्यक्ष गोपाल पोसे, शिवराम वाकडे, गणेश कराळे, शारद कराळे, अंकुश कराळे, श्रीराम कराळे, सुरज खांडेराव, मो.वि. खाकपे, संतोष वाकळे, गजानन खवले, लक्ष्मण मावळे, श्रीकांत खरप, मीणा देशमुख व इतर उपस्थित होते.
(संपादन-विवेक मेतकर)
|