वाशीम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर अनेक गावात तीन ते चार पॅनलमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. १६३ ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायती अविरोध झाल्या असून आता १५३ ग्रामपंचायतींसाठी ३ हजार १९२ उमेदवार नशीब अजमावीत आहेत. प्रचार करताना जेवणावळी झडत असून गावागावात मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
जिल्ह्यातील मोठ्या असलेल्या १६३ ग्रामपंचायतीसाठी ता.१५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या सोमवारी (ता.४) दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. ४ हजार २४२ उमेदवारांपैकी ९६२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता, ३ हजार १९२ उमेदवार रिंगणात आहेत. गावागावात आता घरोघरी प्रचार केला जात असून गावात जेवणावळी झडत आहेत.
निवडणूक आयोगाकडून उमेदवाराची खर्च मर्यादा पंचविस हजार सांगितली तरीही यामध्ये लाखोंची उलाढाल होणार हे मात्र नक्की. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला खऱ्याअर्थाने आजपासून सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. आता उमेदवार बॅनर, डमीपत्रिका आणि मतदारांना आपणच कसे श्रेष्ठ असल्याचे समजावण्यात व्यस्त आहेत. मतदारांची निवडणुकीच्या बहाण्याने चांगलीच सोय होताना दिसत आहे. गुलाबी थंडीच्या वातावरणात रात्रीच्या शेकोटीवर निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
या ग्रामपंचायती झाल्या अविरोध
जिल्ह्यातील वाशीम तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ग्रामपंचायत असलेली तोंडगाव ग्रामपंचायत अविरोध झाली आहे. याबरोबरच सावरगाव जिरे, कोंडाळा झामरे, किनखेडा, भोयता, मोप, मोरंबी, अजनी, उमरवाडी, कोळदरा या ग्रामपंचायत अविरोध झाल्या आहेत.
हेही वाचा - अर्थसंकल्पाची तरतुद 165 कोटींची, खर्च फक्त 15 कोटी 60 लाखांचा
न्यायालयाच्या निकालाने अनेकांना संधी
ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशनपत्र भरताना अनेक उमेदवारांनी राखीव व सर्वसाधारण जागेवरून वेगवेगळे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्रतिस्पर्धी उमेदवार कोण हे लक्षात घेऊन कोणताही एक अर्ज कायम ठेवायची रणनिती होती मात्र, निवडणूक आयोगाने प्रथम आलेले नामनिर्देशनपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राखीव जागेवरील प्रतिस्पर्धी गटाचे अनेक उमेदवार बिनविरोध होण्याची शक्यता होती. यावर अनेक उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. यावर न्यायालयाने तत्काळ सुनावणी घेवून दोनही नामनिर्देशनपत्र ग्राह्य धरण्यात यावे असा निर्णय दिला. हा निर्णय ऐनवेळी आल्याने अनेकांना संधी मिळाली तर, अनेकांच्या अविरोध होण्याची इच्छा अपूरी राहून त्यांना लढत द्यावी लागणार आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.