अकोला ः कोरोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी मार्च २०२० पासून देशात लॉकडाउन करण्यात आले. मात्र याच लॉकडाउनमध्ये कृषी निविष्ठा महागल्याने व नैसर्गिक, अनैसर्गिक संकटांनी गारद केल्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांभोवती आत्महत्येचा फास आवळला असून, अकरा महिन्यात तब्बल १३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्याचे दुर्दव्यी चित्र आहे.
शेतकरी आत्महत्येचे सत्र देशात अन् त्यातही प्रामुख्याने महाराष्ट्रात सर्वाधिक चिंतेचा विषय बनला आहे. नैसर्गिक, अनैसर्गिक संकटांनी दिवसेंदिवस शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट होत गेली आहे. सोबतच महागाईमुळे वाढलेला कर्जाचा डोंगर व घटत गेलेले उत्पन्न शेतकरी आत्महत्येसाठी प्रमुख कारण ठरले आहे. अकोला जिल्ह्यात सुद्धा शेतकरी आत्महत्येची संख्या लक्षणीय असून, यावर्षी तर कोरोना लॉकडाउनमध्ये नियतीने डाव साधत शेतकऱ्यांचे जीवनच उद्ध्वस्त केले आहे.
त्यामुळे जिल्ह्यात गेल्या वर्षीपेक्षा अधिक म्हणजे १३६ शेतकऱ्यांनी यावर्षी आत्महत्या केल्या असून, शासन दरबारी त्यापैकी केवळ ७५ प्रकरणे पात्र ठरली आहेत. गेल्यावर्षी जिल्ह्यात १२५ शेतकरी आत्महत्या प्रकरणे झाली असून, त्यापैकी १०५ प्रकरणे पात्र ठरली होती तर, १९ प्रकरणे अपात्र व एक प्रकरण पेंडीग असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळाली आहे.
यामुळे वाढल्या शेतकरी आत्महत्या
महागलेले बियाणे व कृषी निविष्ठा, उशिरा मॉन्सूनचे आगमण, पावसाचा दीर्घ खंड, सततधार पाऊस, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, वातावरणात वेळोवेळी बदल, कीडींचा व विषाणूजन्य आजारांचा पिकांवर प्रादुर्भाव, कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा हल्ला, मजुरांची मारामार, वाढलेली मजुरी, कोरोनाचे संकट, लॉकडाउनमुळे ढासळलेली शेतमाल विक्री व्यवस्था, बँकांनी नाकारलेले पीककर्ज, कर्जमुक्ती/कर्जमाफीचा अभाव
हेही वाचा - अकोला, वाशीम जिल्ह्यात बसविणार ‘डमी वॉर टँक
शासकीय शेतमाल खरेदीचा अभाव, रखडलेले चुकारे, व्यापाऱ्यांकडून लूट, बाजारात पडलेले भाव, बँका, सावकारांकडून कर्ज वसुलीचा तगादा व या सर्व संकटांमध्ये कुटुंबियांची होत असलेली कुचबिना यामुळे जिल्ह्यात यावर्षी शेतकरी आत्महत्या वाढल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले असून, शासन, प्रशासन स्थरावरून लवकरच त्यावर ठोस व प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर, ही संख्या अजूनही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पात्रचा आकडा कमी
जिल्ह्यात गेल्या वर्षी एकूण १२५ शेतकरी आत्महत्यांची प्रशासन स्तरावर नोंद झाली होती. त्यापैकी १०५ पात्र, १९ अपात्र व एक प्रकरण पेंडिग ठरले होते. यावर्षी मात्र केवळ ११ महिन्यात १३६ शेतकरी आत्महत्या प्रकरणे झाली असून, त्यांचेपैकी केवळ ७५ प्रकरणे पात्र ठरली असून,२८ प्रकरणे अपात्र व ३३ प्रकरणे पेंडीग आहेत
(संपादन - विवेक मेतकर)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.