वाशीम ः केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी व कामगार विधेयक रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी (ता.१३) वाशीम जिल्हा काँग्रेसच्या वतीने माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीमधे संपूर्ण जिल्हाभरातून शेकडो ट्रॅक्टर तर, हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसचे हे सर्वात मोठे आंदोलन ठरले आहे. आंदोलनाने संपूर्ण शहरातील रस्ते व्यापले होते.
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या कायद्याच्या विरोधात वाशीम जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन शुक्रवारी (ता.१३) करण्यात आले होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष मानिकराव ठाकरे, आमदार अमित झनक, आमदार वजाहत मिर्झा, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष ॲड. दिलीपराव सरनाईक जिल्हा प्रभारी प्रकाश साबळे, निरीक्षक संजय राठोड यांच्या नेतृत्वात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून या रॅलीला सुरुवात करण्यात आली.
रॅलीमध्ये शेकडो ट्रॅक्टर सह हजारो शेतकरी सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत ही रॅली मन्नासिंह चौक, शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, अकोला नाका मार्गे जिल्हा कचेरीवर धडकली येथे मानिकराव ठाकरे, आमदार अमित झनक, आमदार वजाहत मिर्झा प्रकाश साबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष डाॅ.शाम गाभणे, शिक्षण सभापती चक्रधर गोटे, पंचायत समिती सभापती रेश्मा गायकवाड, राजुभाऊ चौधरी, दिलीप देशमुख, दिलीप मोहनावाले, राजु वानखेडे, राजु जानीवाले, किसनराव मस्के, शंकर वानखेडे, इफ्तिखार पटेल, प्रकाश वायभासे, नंदाताई गणोदे, विशाल सोमटकर, अबरार मिर्झा, संतोष दिवटे, विरेंद्र देशमुख, दादाराव देशमुख, परशराम भोयर, गजानन भोणे, संतोष उगले, ॲड. पी.पी.अंभोरे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलन ठरले लक्षवेधी
गेल्या पाच वर्षांत काँग्रेसने या आंदोलनाच्या माध्यमातून आपला बॅकलाॅग भरून काढला आहे. या आंदोलनात शेतकरी व कष्टकऱ्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. या आंदोलनात संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती काँग्रेससाठी संजिवणी ठरल्याची चर्चा शहरात होती. पोलिस दलाने चोख बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत केल्याने सर्वसामान्यांची दिवाळीची खरेदी प्रभावित झाली नाही.
रॅलिमध्ये दोनशेहून अधिक शेतकरी ट्रॅक्टर घेवून सहभागी झाले होते. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती मधून रॅलीची सुरुवात झाली असून, शिवाजी चौक, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन रॅलीची सांगता करण्यात आली.
(संपादन - विवेक मेतकर)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.