अकोला : मॉन्सूनचे विदर्भात आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले असले तरी, सध्या एक दिवस पाऊस दोन दिवस खंड, असे चित्र अकोल्यासह वऱ्हाडात पाहायला मिळत आहे. दोन दिवसाच्या खंडानंतर रविवारी सुद्धा अकोल्यात जोरदार पावसाने हजेरी लावली माभ, नियमित मॉन्सूनच्या हजेरीसाठी शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागू शकते, असे मत हवामान अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षात मॉन्सूनचे आमगन लांबल्याने खरीप व पर्यायाने रब्बी हंगाम सुद्धा लांबला. त्याचा पीक उत्पादनावर व गुणवत्तेवर सुद्धा परिणाम होतो. यावर्षी मात्र, अकोला जिल्ह्यासह राज्यात १०० टक्के पर्जन्यमानाचे व जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यातच जोरदार मॉन्सूनच्या संकेत हवामान विभागाने दिले होते. त्यानुसार विदर्भात मॉन्सूनचे आगमन झाले सुद्धा. मात्र, जोरदार पावसाच्या हजेरीसाठी आवश्यक वातावरण निर्मिती झाली नसल्याने, अजूनपर्यंत नियमित पाऊस सुरू झाला नाही.
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये स्थानिक वातावरणानुसार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतर तापमानात वाढ व कोरडे वातावरण पाहायला मिळाले. रविवारी पुन्हा आर्द्रतेचा टक्का वाढला व सायंकाळी अकोला, मूर्तिजापूर, पातूर, बार्शीटाकळी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. परंतु, पुढील दोन दिवस पुन्हा पावसाच्या खंडाची व २३ जून रोजी जोरदार आगमनाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
आर्द्रतेचा टक्का वाढला
पावसाची हजेरी किंवा जोरदार सरी कोसळण्यासाठी वातावरणातील आर्द्रतेची टक्केवारी महत्त्वाची भूमिका बजावते. जर आर्द्रता ७० ते ८० टक्के असेल तर, पावसाची शक्यता अधिक असते आणि त्यापैक्षा आर्द्रतेची टक्केवारी वाढल्यास जोरदार पाऊस कोसळतो. आतापर्यंत जिल्ह्यासह वऱ्हाडात सरासरी आर्द्रता ७० टक्क्यांपेक्षा कमी होती. मात्र, रविवारी सकाळी अकोल्यात ९० टक्के तर, इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा ९० टक्क्यांपेक्षा अधिक होती.
संध्याकाळी सुद्धा आर्द्रतेचा टक्का वाढल्याने, सर्वत्र पावसाचे वातावरण निर्माण झाले व अकोल्यात सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी मात्र, पेरणीची घाई करू नये साधारण १०० मिमी पाऊस पडल्यानंतर किंवा जमिनीला चांगली ओल आल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राद्वारे विदर्भात मॉन्सूनचे आगमन झाल्याचे दोन दिवसांपूर्वीच जाहीर कले होते. मात्र, अजूनपर्यंत मॉन्सूनच्या पावसाचा ओघ दिसून आलेला नाही. दरवर्षीच्या तुलनेत कोंकण व मुंबईमध्ये सुद्धा यावर्षी जूनमध्ये कमी पाऊस पडला. मॉन्सूनचा प्रवास सध्या संथ असून, २२ ते २५ जूनपासून नियमित पावासाला सुरुवात होऊ शकते.
- संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक, मुंबई
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.