दोन वेचणीतच पांढऱ्या सोन्याची उलंगवाडी; कापसाच्या भावात तेजी

Cotton
Cottonsakal

नांदुरा (जि. बुलडाणा) : यावर्षी दसऱ्यापूर्वीच कपाशी पीक लाल पडले असून, कच्ची बोंडे फुटत असल्याने दोन वेचणीतच नगण्य कापूस शेतकऱ्यांच्या घरात येत असून, बहुतांश शेतातीत पिकांची उलंगवाडी झाली आहे. यावर्षीच्या अति पावसामुळे उत्पन्नात घट झाली असून, बागायती कापसाला प्रति एकर ५ ते ६ क्विंटल व कोरडवाहू क्षेत्रात ३ ते ४ क्विंटल उत्पन्न येत आहे. सध्या भिजलेला कापूस वाळल्यामुळे कापसाच्या भावात बऱ्यापैकी तेजी असून, खाजगी व्यापारी साडेसहा हजार रुपये क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करत आहे. मात्र, त्याला वेचाईचा खर्च जास्त येत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.

Cotton
चीनची अर्थव्यवस्था धोक्यात; 'हे' आहे त्यामागील मोठे कारण

यावर्षीच्या खरीप हंगामाची पेरणी ही मृग नक्षत्रात झाल्यामुळे बागायती व कोरडवाहू या दोन्ही कपाशीची वेचणी एकत्र आली. परिणामी मजुरांची तारांबळ उडून शेतकऱ्यांना १० ते १२ रुपये प्रति किलो वेचणीसाठी तर वाहनाचे वेगळे भाडे देऊन कापूस वेचावा लागला आहे. तसेही यावर्षी वेळोवेळी अवकाळी पाऊस येत गेल्याने कपाशीचे पीक कमी कालावधीतच लाल पडले.

कपाशीवर करप्यासदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. परिणामी कच्ची अपरिपक्व बोंडे फुटल्याने सध्या तर एक दोन वेच्यातच या कपाशीची उलंगवाडी होत आहे. त्यामुळे साहजिकच उत्पन्नात घट जाणवत असून काही शेतकऱ्यांना एकरी चार पाच क्विंटलचेच उत्पन्न हाती येणार आहे. तर दुसरीकडे कमी उत्पन्न असतांना वेचाईसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत असल्यामुळे वाढीव भाव शेतकऱ्यांच्या कामी येत नसल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. त्यामुळे शासनाने अति पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता सरसकट सर्व पिकांसाठी हेक्टरी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

दुप्‍पट पैसे देऊनही मजूर मिळेना

तालुक्यात गत आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने कापसाच्‍या वेचणीस सुरुवात झाली. परंतु, कापूस वेचणीसाठी १० ते १२ रुपये किलो भाव देऊनही मजूर मिळत नसल्‍याचे वास्‍तव असून, अशी परिस्थिती तालुक्यातील अनेक गावांत निर्माण झाली आहे. काही शेतकरी तर गावात मजूर मिळत नसल्याने अन्य गावातून मजूर आणून वेचणी करीत आहेत. बाहेरगावावरून मजूर आणताना त्यांच्या जाण्या-येण्यासाठी लागणाऱ्या वाहनाची व्यवस्था त्या शेतकऱ्याला करावी लागत आहे.

"मोठ्या प्रमाणात झालेल्‍या पावसामुळे शेतातील कपाशीची बोंडे लाल पडली असून, पिकावर करप्‍या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्‍याने उत्‍पन्नात घट होत असल्‍याचे दिसते. त्‍यामुळे पीक विमा काढलेल्या व न काढलेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी."

- कैलास जुनारे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com