मताधिकार वाचविणे हे आपले कर्तव्य
राष्ट्रवादी काॅँग्रेसचे नेते शरद पवार यांचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मतदानाचा अधिकार आणि लोकशाही वाचविणे हेच आपले कर्तव्य आहे. त्यासाठी वाटेल ती किंमत देऊ पण मतचोरी थांबवू, असा निर्धार राष्ट्रवादी काॅँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. मतदार यादीतील घोळ सिद्ध करणाऱ्या व्यक्तींना शासन दोषी ठरवून गुन्हे दाखल करीत असल्याचा आरोप करून पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. या वेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात निघालेल्या ऐतिहासिक मोर्चांचे स्मरण केले.
मतचोरी आणि मतदार याद्यांतील घोळांबद्दल निवडणूक आयोगाचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात शरद पवार सहभागी झाले होते. फॅशन स्ट्रीटपासून मोर्चाची सुरुवात झाली, तेव्हा ते आपल्या गाडीने मोर्चा निघण्याच्या ठिकाणी दाखल झाले. त्या वेळी कार्यकर्त्यांनी ‘देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हाे’ अशा जोरदार घोषणांनी त्यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे नेते शरद पवार यांची प्रतीक्षा करीत होते. पवार दाखल होताच मोर्चाला सुरुवात झाली. या वेळी खासदार सुप्रिया सुळेही दाखल झाल्या. पवार हे गाडीमधूनच सभेच्या ठिकाणी पोहाेचले. त्या वेळी त्यांच्या स्वागतासाठी पुन्हा घोषणा झाल्या.
भाषणाच्या सुरुवातीलाच विराट जनसमुदायाला पाहून शरद पवार म्हणाले, ‘आज जमलेला हा विराट मोर्चा पाहून संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात निघालेल्या ऐतिहासिक मोर्चांची आठवण झाली. तेव्हाही अशीच एकजूट होती. आज सगळ्यांनी दाखवलेली एकजूट ही संयुक्त महाराष्ट्राच्या एकजुटीची आठवण करून देणारी आहे. आज राजकीय मतभेद आणि संघर्ष विसरून सर्वांना एकत्र यावे लागेल आणि मतांचा व लोकशाहीचा अधिकार वाचवणे हेच आपले कर्तव्य आहे. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल. हा मोर्चा स्वत:साठी नाही तर लोकशाहीत संविधानाने नागरिकांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी आहे. मतदानाचा अधिकार आणि लोकशाही वाचवू, असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला. राजकीय मतभेद आणि संघर्ष विसरून सर्वांनी एकत्र यावे लागेल. या ठिकाणी इथून जाताना आज हा मतचोरीचा प्रकार आम्ही थांबवणार आहोत, असे ते म्हणाले.
-------------
मतचाेरीला सरकारचे संरक्षण!
विधानसभेच्या निवडणुकांत जे प्रकार झाले त्यामुळे सामान्य माणसाचा संसदीय लोकशाहीवरील विश्वास डगमगला आहे. एखाद्याने आधार कार्डची माहिती देऊन मतदार यादीतील घोळ सिद्ध करून दाखवल्यास शासन खोटा आरोप सिद्ध करणाऱ्या व्यक्तीवरच गुन्हा दाखल करते. याचा अर्थ हे शासन या अशा सगळ्यांना संरक्षण देत आहे, अशी जोरदार टीका शरद पवार यांनी केली. सोलापूर येथील आमदार उत्तमराव जानकर यांनी त्यांच्या मतदारसंघातील मतदारांच्या घोळाचा अनुभव सांगितल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.