अवकाळी पावसाने मजुरी दर गगनाला भिडले
वडखळ, ता. २५ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यातील भातशेती निर्णायक टप्प्यात आली असताना परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. ऐन दिवाळीत कापणी-मळणीचे काम सुरू असून शेतकऱ्यांची दिवाळी शेतातच सुरू आहे. मात्र पाऊस आणि शेतमजुरांच्या टंचाईमुळे भात कापणीचा वेग मंदावल्याने धान्याच्या नुकसानीचा धोका वाढला आहे.
औद्योगिकीकरणाच्या वाढत्या संधीमुळे अनेक मजूर शहरांकडे वळल्याने शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. ज्या मजुरांची उपलब्धता आहे, त्यांची मजुरी ६०० ते ८०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मजुरांची मनधरणी करावी लागत आहे. सूर्याचा प्रखर तडाखा आणि ओलसर शेतांमुळे मजूर कापणीस नकार देत आहेत, यामुळे अडचणी अधिक वाढल्या आहेत. भात परिपक्व अवस्थेत आल्यानंतर मोठ्या उत्साहात कापणी सुरू झाली होती. परंतु अवकाळी पाऊस आणि ऑक्टोबर हिट यामुळे भाताच्या लोंब्यांमधून दाणे सुटू लागल्याने उत्पन्नात मोठ्या नुकसानाची शक्यता निर्माण झाली आहे. दुर्गम भागांतील मजूर दिवाळीपूर्वी आपल्या गावाकडे परतत असल्याने कापणीचे नियोजन कोलमडत आहे. काही भागात मजूर उपलब्ध नसल्याने घरच्या घरी कापणीचे काम करण्यात येत आहे. पेण तालुक्यात तर अनेक ठिकाणी कापलेला भात पावसाने भिजला असून काही पिके कोसळल्याने कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणाने आणि मजुरांच्या टंचाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे. कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून शासनाने विदर्भ-माराठवाड्याप्रमाणे तातडीने मदत द्यावी, अशी एकमुखी मागणी शेतकरी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.