संतोष कानडे
राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे. भाजपने 132 जागांवर यश मिळवलं तर शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या. घटकपक्ष आणि इतर मिळून महायुतीने २३५ जागा जिंकल्या.
तर महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या. यात काँग्रेसने १६, ठाकरे गटाने २०, शरद पवार गटाने १० जिंकल्या.
महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपामध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याचं दिसून आलं होतं. त्यांना गृहमंत्रीपद पाहिजे होतं. परंतु भाजपने त्यांना ते दिलं नाही. त्यामुळे शिंदे शपथ घेतील की नाही, हे शेवटपर्यंत ठरलेलं नव्हतं.
शेवटी एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र मागच्या काही दिवसांपासून शिंदे शांत असल्याचं दिसून येतंय. शिवसेनेत अंतर्गत नाराजी आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतोय.
एकनाथ शिंदे हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं काही ज्योतिषी सांगत आहेत. २०२७ मध्ये त्यांचे मुख्यमंत्री पदाचे योग आहेत, असं सांगण्यात येतंय.
छत्रपती संभाजी नगर येथे योगिराज ज्योतिष व वास्तू अनुसंधान संस्था आयोजित आठव्या संमेलनामध्ये १३० ज्योतिष अभ्यासकांनी सहभाग घेतला होता. या संमेलनातील सहभागी ज्योतिषांनी हे संशोधन मांडले आहे.
राजकीयदृष्ट्या पुढचा काळ देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी संघर्षाचा असल्याचं ज्योतिष सांगतात. याच काळामध्ये विरोधकदेखील प्रबळ होतील आणि सत्तेमध्ये अंतर्गत संघर्ष वाढेल, असं सांगितलं जात आहे.
२०२५ हे वर्ष उद्योगांच्या बाबतीत चांगलं वर्ष असल्याचं ज्योतिषी सांगतात. मात्र या राजकारणामध्ये संघर्ष वाढलेला दिसणार आहे.
एकनाथ शिंदे हे खरंच राज्याचे मुख्यमंत्री होतात का, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. सध्यातरी ते अलिप्त असल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जवळीक निर्माण होण्याचे संकेत दिसून येत आहेत.