सूरज यादव
भारताच्या संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमी आहार घ्यायचे पण त्यांच्या आहाराबाबतच्या आवडी निवडी मात्र ठरलेल्या होत्या.
आंबेडकर परदेशात शिकताना त्यांना पाश्चिमात्य खाद्यसंस्कृतीची भूरळ पडली. त्या पदार्थांची चव आयुष्यभर टिकून राहिली असं दुसऱ्या पत्नी सविता यांनी आत्मचरित्रात लिहिलंय.
नाश्त्यात आधी पॉरिज किंवा कॉर्न फ्लेक्स, त्यानंतर अंडी- कधी शिजवलेली, कधी हलक्या आचेवर शिजवलेली किंवा कधी आमलेट, भुरजी आणि त्यासोबत टोस्ट, बटर व वेगवेगळ्या प्रकारचे जॅम ते खायचे.
नाश्त्यातले पदार्थ खाल्यानंतर ते आवडणारी कॉफी घेत. चहा घेणार असतील तर त्यांना उकळलेला चहा, साखर व दूध वेगवेगळ्या भांड्यांतून द्यावा लागत असे.
दुपारचं जेवण फारच कमी असायचं. सूप, गव्हाच्या पिठाचे दोन लहान फुलके व थोडासा भात घ्यायचे. सोबत मांसाहारी पदार्थाचे एक-दोन तुकडे घेत असत.
मांसाहारामध्ये त्यांना रोस्टेड, कोल्ड मटण, मासळी, त्यातही हिलसा, तळलेले पॉपलेट, कोळंबी फ्राय हे पदार्थ विशेष आवडत असत.
आंबेडकर कलकत्त्यात सरकारी नोकरी करणारे सहकारी डी. जी. जाधव यांना सांगून हिलसा मासळी बर्फात पॅक करून विमानाने मागवत असत.
चिकनमध्ये चिकन फ्राय, चिकन करी, तंदूरी चिकन, असे पदार्थ आहारात असायचे. जेवण झाल्यावर ते पुडिंग खात. पहिल्या पत्नी रमाबाई यांच्या हातची बोंबील चटणी आंबेडकरांना प्रिय होती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शक्यतो रात्रीचं जेवण टाळायचे. त्याऐवजी वाचन, लिखाणात ते वेळ घालवत असत.