संतोष कानडे
वंजारा समाज आणि बंजारा समाज एकच आहेत, असं अनेकांना वाटू शकतं. पण ते तसं नाही.
बंजारा समाज हा गोर बंजारा किंवा लमाण म्हणून ओळखल जातो. हे लोक देशभरात विखुरलेले आहेत. तांड्याने फिरुन ते उदरनिर्वाह करतात.
बंजारा समाजाचा इतिहास हा सिंधू संस्कृतीपर्यंत जोडला गेलेला आहे. बंजारा ही एकेकाळी व्यापारी जमात होती.
व्यापारासह लढायांमध्ये गुंतलेल्या सैनिकांना रसद पुरवण्याचं काम बंजारा समाजाचे लोक पूर्वी करत. विशेष म्हणजे ते व्यापारी म्हणून तटस्थ असत.
महाराष्ट्रामध्ये मुघलांच्या काळात बंजारा समाजाचे लोक आले. मराठा साम्राज्यालाही त्यांनी रसद पुरवण्याचं काम केलं.
बंजारा समाजातील धुरिणांनी शेकडो विहिरी, तलावं, धर्मशाळा आणि किल्ले बांधल्याचा इतिहास आहे.
इंग्रजांच्या काळामध्ये रेल्वे आल्यामुळे बंजारा समाजाचा व्यापार बंद झाला आणि लोक देशोधडीला लागले. कंपनी सरकारने समाजाला गुन्हेगारी समाज म्हणून शिक्का मारला.
वंजारा समाजा हादेखील एक व्यापारी समाज आहे. केवळ व्यापारीच नाही तर ही एक लढाऊ जमात मानली जायची.
वंजारी हे रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींचे वंशज आहेत, असं राजस्थानमध्ये मानलं जातं.
राणा प्रताप यांच्या दरबारामध्ये श्री भल्लसिंघ वंजारी व फत्तेसिंघ वंजारी हे प्रधान सेनापती होते.
वंजारा समाज स्वतःला राजपूत कुळातील राणाप्रताप यांचे वंशज समजतो, असं इतिहास संशोधक संजय सोनवणी म्हणतात.
मुघलांच्या काळात वंजारा लोक मुस्लिमांबरोबर दक्षिणेत आले, असं सांगितलं जातं. मात्र याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये वंजारी तरुणांचा समावेश होता, असं दावा केला जातो.
वंजारी आणि बंजारा हे शब्द जरी सारखे वाटत असले तरी दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत. दोन्ही समाजाच्या भाषा, संस्कृती निराळ्या आहेत.
बंजारा आणि वंजारी या दोन्ही समाजातील आडनावे वेगवेगळी आहेत. वंजारी समाज भगवान बाबांची भक्ती करतो तर बंजारा समाज संत सेवालाल महाराजांची भक्ती करतो.