सकाळ डिजिटल टीम
सध्या आपल्याला बाहेर खाण्या-पिण्याच्या सवयी वाढल्या आहेत. तुम्ही चहा शौकीन असाल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. तुम्ही पेपर अथवा प्लास्टिकच्या कपामधून पदार्थांचे सेवन करत असाल, तर लवकरच तुम्हाला 'कॅन्सर' सारखा आजार होऊ शकतो.
एखाद्या कॅफे अथवा कोणताही चहाचा स्टॉल, टपरी अशा बऱ्याच ठिकाणी पेपर नाहीतर, प्लास्टिक कपांचा वापर केला जातो. मात्र, दैनंदिन सहज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, याचा तुम्ही कधी विचार केलाय?
कागदी कपामध्ये चहा अथवा कोणतेही गरम पेय प्यायल्याने प्लास्टिकचे कण त्यात विरघळू लागतात. काही प्लास्टिकचे कप बिस्फेनॉल ए (बिपीए) अथवा पॅथोलेट्स सारख्या हानिकारक रसायनांचा वापर करून तयार केले जातात.
बिस्फेनॉल ए (बिपीए) अथवा पॅथोलेट्स याचा शरीरात प्रवेश झाल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे शरीराच्या अनेक भागांवर विपरीत परिणाम दिसून येतात.
प्लास्टिकमुळे होणारी हानी टाळण्यासाठी बहुतेक लोक पेपर कप वापरतात. मात्र, पेपर कप वापरणेही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
पेपर कप तयार करण्यासाठी, प्लास्टिक किंवा मेणाचे कोटिंग केले जाते. पेपर कपमध्ये गरम पेय, पदार्थ टाकल्यास त्यामध्ये रसायने मिसळू शकतात. त्यामुळे याच्या सेवनाने हे विषारी पदार्थ थेट शरीरात जाऊ शकतात.
दैनंदिन वापरातील प्लास्टिक कोटिंग वस्तूमुळे अनेक दुर्धर आजारासह फुफ्फुस, पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. शिवाय प्लास्टिक, प्लास्टिक कोटिंग वस्तू वापरातील असो अथवा टाकाऊ त्या असंख्य संसर्गाच्या रोगाचे प्रसार माध्यम आहे. - डॉ. इस्माईल मुल्ला, जिल्हा शल्य चिकित्सक, धाराशिव.