Sandip Kapde
शिवराज्याभिषेक झाल्यानंतर काही दिवसांतच राजमाता जिजाऊंचे निधन झाले होते.
त्यांच्या मृत्यूनंतर जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मोठी रक्कम ठेवली होती.
ही रक्कम नेमकी किती होती? आजच्या काळात तिची किंमत किती असेल?
जिजाऊंनी ही रक्कम कशी साठवली होती? आणि ती शिवरायांना देण्यामागे त्यांचा हेतू काय होता?
साडेतीनशे वर्षांपूर्वी जिजाऊ या जगाचा निरोप घेऊन गेल्या, परंतु शिवाजी महाराजांसाठी मोठा ठेवा मागे ठेवून गेल्या.
रायगडावरील ओलसर आणि थंड हवामान वयस्क जिजाऊंसाठी कठीण होत असल्याने, गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात त्यांच्यासाठी वाडा बांधण्यात आला.
याच वाड्यात जिजाऊंचे निधन झाले.
जिजाऊंनी शिवरायांसाठी ठेवलेल्या रकमेची माहिती डच व्यापाऱ्याच्या पत्रातून मिळते.
शिवकाळात कोकणातील वेंगुर्ला येथे डचांची मोठी व्यापारी वखार होती.
या डच व्यापाऱ्यांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाची माहिती हॉलंडमधील वरिष्ठांना कळवली होती.
३ ऑक्टोबर १६७४ च्या पत्रात लिहिले आहे की शिवरायांच्या मातोश्री वृद्धावस्थेत असूनही राज्याभिषेकाला उपस्थित होत्या.
मात्र, राज्याभिषेकानंतर केवळ १२ दिवसांनी त्यांचे निधन झाले.
जिजाऊंनी आपल्या पुत्रासाठी २५ लाख पगोडे, काहींच्या म्हणण्यानुसार त्याहून अधिक ठेवले होते.
पगोडा म्हणजे त्या काळातील सोन्याचे नाणे, ज्याचे वजन ३.३७ ग्रॅम होते आणि किंमत जवळपास पाच रुपये होती.
याचा अर्थ असा की जिजाऊंनी शिवरायांसाठी ठेवलेल्या रकमेची किंमत त्या काळात सव्वा कोटी रुपयांच्या आसपास होती.