Sandip Kapde
शेगाव हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात प्रसिद्ध झाले ते श्रीसंत गजानन महाराजांच्या पावन वास्तव्यामुळे. आज त्यांचा प्रगट दिन आहे, जो भक्तगण अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा करतात.
शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव असून सध्या तालुक्याचे ठिकाण आहे. पूर्वी ते खामगाव तालुक्यातील एक प्रमुख शहर म्हणून ओळखले जात असे.
फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘शेगाव’ असे नाव रूढ झाले. संत महंत वेबसाईटवर हा उल्लेख आहे.
संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रगटले.
तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजीचा.
श्री. देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले.
“गण गण गणात बोते” हे अहर्नीश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले.
सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला.
दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला.
त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते.
अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे.
कुत्रा, गाय, घोडा ह्यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे हेही त्यांनी सोदाहरण दाखविले.
भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घडविले. महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले. अनेकांचे गर्वहरणही त्यांनी केले.
श्री गजानन महाराज (gajanan maharaj) हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोचलेले महान संत होते. मिळेल ते खावे, कोठेही पडून रहावे, कोठेही मुक्त संचार करावा, महाराजांच्या या अशा अवलिया स्वभावामुळेच सर्व भक्त बुचकळ्यात पडायचे.
२००४ साली प्रकाशित झालेल्या “श्री गजानन महाराज चरित्र कोश” ह्या दासभार्गव नावाच्या लेखकाने शेगावात राहून आठ वर्षांच्या संशोधनानंतर हे पुस्तक प्रकाशित केले,