सकाळ डिजिटल टीम
उन्हाळी हंगामाकरिता एसटी बसेस सज्ज असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने पत्रकाद्वारे दिली.
पत्रकातील माहितीनुसार, १० एप्रिल ते १५ जून हा उन्हाळी गर्दीचा हंगाम असल्याने या महिन्यात रा. प. महामंडळामार्फत प्रवाशांच्या सोयीसाठी जादा वाहतूक करण्यात येते.
उन्हाळी गर्दी हंगामामध्ये प्रवाशी मोठ्या प्रमाणात पर्यटन आणि तीर्थाटनासाठी बाहेर पडतात.
त्या प्रवाशांची गरज ओळखून कोल्हापूर विभागामार्फत मुंबई, बोरीवली, पुणे, ठाणे, रायगड, बीड, परभणी, शिर्डी, लातूर, संभाजीनगर, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण मार्गावर जादा बसेसचे नियोजन केले आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन आरक्षणासाठी बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
एप्रिल, मे आणि जूनमध्ये विवाह मुहूर्त असल्याने राज्य परिवहन कोल्हापूर विभागामार्फत लग्न कार्यासाठी विशेष बस सेवेअंतर्गत आणि ग्रुप बुकिंगवर बसेस देण्याबाबत नियोजन केले आहे.
प्रवाशांनी राज्य परिवहन वाहतुकीचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर विभागाच्या विभाग नियंत्रकांनी केले आहे.