Aishwarya Musale
पाठदुखी ही अनेकांसाठी अगदी सामान्य समस्या असते. सतत बैठे काम केल्याने किंवा महिलांच्या बाबतीत जास्त काळ ओट्यापुढे उभे राहिल्याने पाठदुखीची तक्रार उद्भवते असा आपला समज असतो.
मग आराम केल्यावर किंवा थोडा व्यायाम केल्यावर हे पाठीचे दुखणे कमी होईल म्हणून आपण ते अंगावर काढतो. पण केवळ बैठ्या कामाने किंवा गाडी चालवल्यानेच पाठ दुखते असे नाही.
तर पाठदुखी मागे आहारातून पुरेसे पोषण न मिळणे आणि शरीरात विविध जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होणे ही मुख्य कारणे असू शकतात.
आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर पाठ किंवा कंबरदुखीची समस्या उद्भवू शकते.
शरीरातील एनर्जी कायम ठेवण्यासाठी या व्हिटॅमिनची आवश्यकता असते. मात्र शरीरात एनर्जी कमी असेल, आणि व्हिटॅमिन बी १२ चीही कमतरता असेल तर कंबरदुखीची तक्रार उद्भवू शकते.
हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर कॅल्शियम शोषले जात नाही.
कॅल्शियम शरीरात शोषले गेले नाही तर हाडे, पाय, पाठ, खांदे असे सगळे अवयव दुखतात. म्हणूनच पाठदुखी होत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन आणि कॅल्शियमची कमी असण्याची शक्यता असते.
म्हणूनच आहारात सर्व प्रकारची खनिजे, व्हिटॅमिन्स यांचा समावेश राहील याची काळजी घ्यायला हवी. यासाठी सर्व भाज्या, फळे, कडधान्ये, डाळी यांचा आहारात समावेश करायला हवा.