वाढत्या "ऑटोमेशन'चा कामगारांना फटका बसणार
नवी दिल्ली : स्वयंचलित यंत्रणेचा (ऑटोमेशन) प्रवेश आता प्रत्येक क्षेत्रात झाला असून, 2021 पर्यंत ऑटोमेशनमुळे जगभरातील दहापैकी चार रोजगार कमी होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अभियांत्रिकी, उत्पादन, वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान आणि बॅंकिंग या क्षेत्रात "ऑटोमेशन'चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने साहजिकच कामगारांचा रोजगार हिरावून घेतला जात आहे. याविषयी पीपलस्ट्रॉंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक पंकज बन्सल म्हणाले, ""पुढील तीन ते चार वर्षांत "ऑटोमेशन'चे परिणाम दृश्य स्वरूपात दिसू लागतील. प्रामुख्याने उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, पायाभूत सेवा, सुरक्षा सेवा आणि कृषी क्षेत्रावर याचे परिणाम दिसतील. आमच्या अंदाजानुसार, 2024 पर्यंत जगभरात दहापैकी चार रोजगार "ऑटोमेशन'मुळे कमी झालेले असतील. या चारपैकी एक जण भारतातील असेल. भारतातील एकूण 23 टक्के रोजगार कमी होतील.''
केलीओसीजी इंडिया कंपनीचे संचालक फ्रान्सिस पदामदान म्हणाले, ""मागील पाच वर्षांपूवी "असेंब्ली लाइन'मध्ये दीड हजार रोजगार होते. "ऑटोमेशन'मुळे ही संख्या कमी होऊन आता पाचशेवर आली आहे. "ऑटोमेशन'मुळे पूर्णपणे रोजगार कमी होणार नाहीत. कारण रोबोची निर्मिती आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कामगाराची गरज लागणार आहे. त्यामुळे याचा फटका तळातील कामगारांना अधिक बसेल.''
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.