पुणे - भविष्यात सर्व क्षेत्रांतील स्पर्धा वाढत जाणार असून कर्जवितरणासाठी विविध स्वरूपाच्या व्यवसायांमध्ये असलेल्या संधी आणि जोखीम यांचा अंदाज घेण्याची क्षमता बॅंकांमध्ये काम करणाऱ्या अर्थतज्ज्ञांना विकसित करावी लागेल, असे मत "येस बॅंके'च्या समूहअध्यक्ष आणि मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. शुभदा राव यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. "भारतीय अर्थविज्ञानवर्धिनी'च्या ( इंडियन स्कूल ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त व संस्थापक प्रा. वि.म. दांडेकर यांच्या स्मृत्यर्थ आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.
"नव्वदच्या दशकानंतर देशाची अर्थव्यवस्था आणि बॅंकिंग क्षेत्र यांना सातत्याने बदलांना सामोरे जावे लागते आहे. आता त्या बदलांचा वेग वाढला आहे. बॅंकिंग अर्थतज्ज्ञांना पूर्वी वर्षातून चार वेळा धोरणांचा आढावा घेतला तरी पुरेसे ठरत होते. मात्र आता दर महिन्यालाच हा आढावा घ्यावा लागतो आहे', असे सांगून त्या म्हणाल्या," बाजारातील पतपुरवठा आणि पतधोरणाच्या संदर्भात बॅंकांनी अधिक सजगपणे काम करण्याची आवश्यकता आहे. जागतिक परिस्थितीतील अनिश्चितता आणि त्याचे परिणाम याचा अंदाज बांधताना पूर्वगृहितांना कवटाळून राहणे धोक्याचे असते.'
बॅंकांच्या वित्त पुरवठ्यात वाढ होण्यासाठी ग्राहकांची क्रयशक्तीही तितक्याच ताकदीने वाढली पाहिजे. अन्यथा बॅंकांना अडचणींना तोंड द्यावे लागू शकते, याकडे डॉ. राव यांनी लक्ष वेधले. त्यांनी सांगितले,की एकीकडे आर्थिक विकासाला गती देण्याचे आणि त्याचवेळी तूट आटोक्यात ठेवण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. या परिस्थितीत परदेशी बाजारात कर्जरोखे उभारण्याचा विचार चालू आहे. पण त्यात मोठी जोखीम घेऊ नये. प्रास्ताविक व सूत्रसंचालन अभय टिळक यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रा. श्रीरामन होते.
|