मुंबई : कोरोनाच्या काळात (corona pandemic) पिछेहाट झालेली भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) आता पूर्ववत होण्याच्या बेतात आहे. मात्र ती पूर्ण क्षमतेनुसार वाढण्यासाठी खासगी भांडवली गुंतवणुकीचा (Private investments) प्रवाह वेगाने सुरु झाला पाहिजे, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (RBI Governor) शक्तिकांत दास (Shaktikanta das) यांनी आज येथे व्यक्त केले.
कायमस्वरुपी टिकणारा आणि स्थिर विकास हवा असल्यास खासगी गुंतवणुकीला तरणोपाय नाही, यावरही दास यांनी भर दिला. कोरोनाकाळात अर्थव्यवस्था वाढीची गती मंदावली होती. आता कोरोना संपत आल्यावर तिच्यात अजूनही वेगाने आगेकूच करण्याची क्षमता आहे. मात्र खासगी गुंतवणुक हेच त्यावरील उत्तर आहे. अनेक अर्थतज्ञांनी यावर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वेगाचा अंदाज दहा टक्क्यांपासून साडेआठ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.
मात्र रिझर्व्ह बँक आपल्या साडेनऊ टक्क्यांच्या अंदाजावर अजूनही कायम आहे. गुंतवणुकीचे खरे चक्र साधारण पुढील आर्थिक वर्षापासून सुरु होईल. मात्र तेव्हा बँकांनीदेखील गुंतवणुक करण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. खरे पाहता सन 2013 पासून बाजारातून खासगी भांडवली गुंतवणुक रोडावली आहे. पण ती पुढील आर्थिक वर्षाच्या मध्यापासून सुरु होण्याची अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.
बँकांचा ताळेबंद सुधारत असून त्यांची बुडित-थकित कर्जेही कमी झाली आहेत. तरीही त्यांची भांडवली व्यवस्थापन प्रक्रिया सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी दाखवून दिले. आयटी उद्योजकांचे कौतुक करताना नवउद्यमी निर्माण करण्यात देशाने आघाडी घेणे ही सुखावह बाब आहे. त्यामुळे देशात अब्जावधी रुपयांची परकीय गुंतवणुक होत असल्याचेही दास म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.