'टाटा' कुणाची खासगी मालमत्ता नाही : मिस्त्री 

Cyrus Mistry
Cyrus Mistry

मुंबई : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी पुन्हा एकदा रतन टाटा यांचे नाव न घेता टीका केली. टाटा समूह कुणाची खासगी मालमत्ता नाही, अशी खोचक टिप्पणी मिस्त्री यांनी केली. तसेच टाटाच्या कारभारात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

मिस्त्री यांनी टाटा समूहातील कंपन्यांच्या भागधारकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की ''टाटा समूह कुणाची वैयक्तिक मक्तेदारी नाही. हा समूह कुण्या एका व्यक्ती अगर टाटा विश्‍वस्त मंडळाचाही नाही. समूहाचे सर्व निर्णय कुणा एका व्यक्ती किंवा 'हायकमांड'कडे असणे हे अनैतिक, अनुचित व अविश्‍वासार्ह आहे.'' 

मिस्त्री यांनी टाटाच्या कारभारामध्ये सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी करताना म्हटले, की ''टाटा सन्स, विशेषकरून टाटाच्या विश्‍वस्त मंडळामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. बिघडलेल्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याचे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. व्यवस्थेतील सुधारणेसाठी केंद्राने हस्तक्षेप करावा. टाटाच्या विश्‍वस्त मंडळामध्ये सुधारणा न केल्यास 'टाटा'च्या संस्थापकांच्या स्वप्नांना धोका आहे, असेही मिस्त्री यांनी या पत्रात म्हटले आहे. 

मिस्त्री यांनी भागधारकांना व्यक्त होऊन भविष्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. येत्या काही दिवसांमध्ये टाटा समूहातील सहा प्रमुख कंपन्यांची बैठक होणार आहे. या कंपन्यांमध्ये टीसीएस व टाटा मोटर्स यांचा समावेश आहे.

या बैठकीत मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून हटविण्यासंबंधी विचार करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मिस्त्री यांनी पत्र लिहून चर्चेत राहण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com