"जीएसटी'चा परिणाम अल्पकालीन - जेटली 

"जीएसटी'चा परिणाम अल्पकालीन - जेटली 

मुंबई - वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी ही ऐतिहासिक सुधारणा होती, या करप्रणालीच्या अंमलबजावणीनंतर केवळ दोन तिमाहींपुरताच अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम झाला, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन यांनी नोटाबंदी आणि "जीएसटी'च्या अंमलबजावणीमुळे देशाचा आर्थिक विकास खुंटल्याचा दावा केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर आज जेटली यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. 

"युनियन बॅंक ऑफ इंडिया'ने शंभर वर्षे पूर्ण केल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जेटली यांनी पुन्हा एकदा "जीएसटी'चे समर्थन केले. नव्या करप्रणालीनंतर दोन तिमाहींपुरताच विकासावर परिणाम झाला, त्यानंतर आर्थिकवृद्धीदर 7 टक्‍क्‍यांवर गेला, पुढे तो 7.7 टक्‍क्‍यांवर पोचला. मागील तिमाहीमध्ये त्याने 8.2 टक्‍क्‍यांचा वेग गाठला होता. या वेगाची 2012 ते 14 सालच्या वाढीशी तुलना करता चालू अर्थव्यवस्थावाढीचा वेग हा पाच ते सहा टक्‍क्‍यांनी अधिक आहे. देशातील बॅंकिंग व्यवस्था मजबूत करून प्रगतीचा वेग वाढवायचा असेल तर आपल्याला थकीत कर्जांचे प्रमाण कमी करावे लागेल. बॅंकिंग प्रणालीमध्ये सुधारणा झाल्यास याचा परिणाम बाजारपेठेवरदेखील होईल असा विश्‍वास जेटली यांनी व्यक्त केला. 

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच 1 जुलै 2017 रोजी देशाने करप्रणालीमध्ये सुधारणा घडवून आणली. यामुळे देशाच्या आर्थिक वृद्धीदरावर परिणाम होणे अपेक्षित होते आणि केवळ दोन तिमाहींसाठीच हा परिणाम दिसून आला. या काळात आर्थिक वृद्धीदर मंदावला होता. 
- अरुण जेटली, अर्थमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com