Honda
Honda

'होंडा'ने भारतात रिकॉल केल्या ६५,००० कार

जपानची आघाडीची कार उत्पादक कंपनी, होंडाने ६५,६५१ कार बाजारातून परत मागवल्या आहेत. २०१८ मध्ये उत्पादन झालेल्या या कारमध्ये असलेल्या फ्युएल पम्पमध्ये तांत्रिक बिघाड असल्याच्या कारणास्तव होंडाने या कार परत मागवल्या आहेत. कारच्या फ्युएल पम्पमध्ये असलेल्या तांत्रिक दोषामुळे कारचे इंजिन बंद पडू शकते किंवा कार सुरू होण्यात अडचणी येऊ शकतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परत मागवण्यात आलेल्या कारमध्ये ३२,४९८ सेडान अमेझ, १६,४३४ सेडान सिटी, ७,५०० प्रिमियम हॅचबॅक जॅझ, ७,०५७ डब्ल्यूआर-व्ही, १,६२२ बीआर-व्ही, ३६० ब्रायो आणि १८० प्रिमियम एसयुव्ही सीआर-व्हीचा समावेश आहे.

'होंडाच्या भारतातील डिलरकडे कारमधील फ्युएल पम्पची दुरुस्ती किंवा बदल विनाशुल्क करून दिले जाणार आहे. २० जून २०२०पासून टप्प्याटप्प्याने ही सुविधा पुरवली जाईल आणि प्रत्येक कारमालकाशी व्यक्तिश: संपर्क साधला जाईल. सध्या डिलर मर्यादित कर्मचाऱ्यांनिशी कार्यरत असल्यामुळे सुरक्षेच्या आणि सोशल डिस्टंसिंगचे निकष पाळत ही सुविधा पुरवली जाणार आहे. कोणताही गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी डिलरला भेट देण्यापूर्वी अपॉईंटमेंट घ्यावी', असे कंपनीने म्हटले आहे.

दरम्यान कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या सुविधेवर १७ आकडी व्हेहिकल आयडेन्टिफिकेशन नंबर टाकून ग्राहकांना आपली कार रिकॉल सुविधेअंतर्गत येते की नाही हे तपासता येणार आहे. 

कधीकाळी वाहन रिकॉल करणे ही अतिशय वाईट समजली जाणारी बाब अलीकडच्या काळात जागतिक वाहन उद्योगात नेहमीची होऊन बसली आहे. सुट्या भागाच्या छोट्याशा बिघाडामुळे निर्माण झालेल्या अडचणीमुळे वाहनाच्या कामगिरीवर परिणाम होतो आहे. अर्थात वाहन रिकॉल करणे हे हा व्यवसाय दिवसेंदिवस अधिकाधिक पारदर्शक आणि प्रामाणिक होत चालल्याचेच लक्षण आहे. 

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात मारुती सुझुकी या देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीने ६३,४९३ कार परत मागवल्या होत्या. यात सिअॅझ, एर्टिगा, एक्सएल६ यांचा समावेश होता. मोटर जनरेटरची पाहणी करण्यासाठी या कार कंपनीने परत मागवल्या होत्या. तर मागील वर्षी जुलै महिन्यात फोर्डने २२,६९० एसयुव्ही एंडेव्हर परत मागवल्या होत्या. चेन्नई येथील उत्पादन प्रकल्पात फेब्रुवारी २००४ ते सप्टेंबर २०१४ दरम्यान या कारचे उत्पादन करण्यात आले होते.

भारतातील आतापर्यतचा सर्वात मोठा रिकॉल हा जुलै २०१५ मध्ये जनरल मोटर्स कंपनीने केला होता. त्यावेळेस कंपनीने १.७ लाख बीट कार परत मागवल्या होत्या. फोर्डने अनेक वेळा वाहने रिकॉल केली आहेत. ऑगस्ट २०१२ मध्ये कंपनीने १,२५,००० कार रिअर अॅक्सल आणि पॉवर स्टिअरिंगमधील बिघाडासंदर्भात रिकॉल केल्या होत्या. इतरही वेळा फोर्डने भारतात वाहने रिकॉल केली आहेत. मागील १५ वर्षात फोर्डने भारतात एकूण ३ लाख कार रिकॉल केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com