आयुर्विमा योजना होणार अधिक ग्राहकाभिमुख

Life-insurance-plan
Life-insurance-plan

विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात ‘आयआरडीए’च्या आयुर्विमा पॉलिसींसदर्भातील नवी नियमावली येत्या एक डिसेंबरपासून लागू होणार आहे. आयुर्विमा योजनांच्या बाबतीत पारदर्शकता वाढावी आणि या योजना चुकीच्या पद्धतीने ग्राहकांच्या गळी उतरवण्यास आळा बसावा यासाठी ‘आयआरडीए’ने नवी नियमावली आखली आहे. सर्व विमा कंपन्यांना यापुढे आयुर्विमा पॉलिसी विकताना या नव्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक  असणार आहे. 

अपेक्षित परताव्याचे तपशील
या संदर्भातील परिपत्रक ‘आयआरडीए’ने २६ सप्टेंबर २०१९ रोजी सर्व विमा कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले होते. या परिपत्रकानुसार विमा कंपन्यांनी सर्व नॉन लिंक्‍ड आणि युनिट लिंक्‍ड विमा पॉलिसींवर अपेक्षित असलेला परतावा; तसेच इतर लाभ यांचे तपशील आपल्या ग्राहकांसमोर पॉलिसी विकण्यापूर्वी स्पष्टपणे मांडायचे आहेत. यापुढे विमा कंपन्यांना युनिट लिंक्‍ड पॉलिसींवर ४ टक्के आणि ८ टक्के परतावा अशा दोन प्रस्तावित शक्‍यतांनुसार सर्व माहिती द्यावी लागणार आहे. 

पारदर्शकता वाढणार
त्याचबरोबर या प्रस्तावित परताव्यासंदर्भात विमा कंपन्यांनी कोणतीही हमी देऊ नये, असे ‘आयआरडीए’ने स्पष्ट केले आहे. आयुर्विमा पॉलिसीसंदर्भात सर्व माहिती असलेल्या माहितीपत्रकावर पॉलिसी घेणारा ग्राहक आणि विकणारा विमा प्रतिनिधी यांना सह्या कराव्या लागणार आहेत. हा दस्तावेज पॉलिसीच्या कागदपत्रांचाच एक भाग असणार आहे. या दस्तावेजाचे स्वरूप ‘आयआरडीए’ने दिलेल्या स्वरूपाप्रमाणेच ठेवावे लागणार आहे. ग्राहकांना आयुर्विमा पॉलिसी घेण्यापूर्वी त्या योजनेची पूर्ण माहिती पारदर्शकरीत्या उपलब्ध व्हावी आणि मगच त्याने तो निर्णय घ्यावा, असे अपेक्षित आहे. विमा कंपन्यांनी हमी (गॅरंटी) असलेले लाभ आणि विनाहमी (नॉन गॅरंटी) असलेले लाभ ग्राहकांसमोर स्पष्टपणे मांडायचे आहेत.

‘एलआयसी’च्या योजना बंद होणार
विमा क्षेत्रांतील तज्ज्ञांनुसार, ३० नोव्हेंबरनंतर विमा क्षेत्रातील जवळपास ७५-८० नॉन लिंक्‍ड आणि युनिट लिंक्‍ड विमा योजना बंद होतील, कारण या योजना ‘आयआरडीए’च्या नव्या नियमावलीनुसार नाहीत. सरकारी आयुर्विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) जवळपास दोन डझन वैयक्तिक आयुर्विमा योजना, आठ समूह विमा योजना आणि सात ते आठ रायडर प्लॅन येत्या ३० नोव्हेंबरला बंद केले जाणार असल्याची माहिती आहे. नव्या प्लॅनचे बोनस दर कमी असतील आणि प्रिमियम मात्र वाढीव असणार आहेत, असे समजते.

जुन्या पॉलिसी जुन्या नियमानुसारच चालू राहणार
‘आयआरडीए’च्या नव्या नियमावलीनुसार, एक डिसेंबरनंतर विविध कंपन्यांच्या सुधारित आयुर्विमा योजना बाजारात आणल्या जातील. पण तत्पूर्वी विकल्या गेलेल्या जुन्या योजना या जुन्या अटी-शर्तींनुसारच चालू राहणार आहेत. त्यात कोणताही बदल होणार नाही. त्यांचे हप्तेही बदलणार नाहीत, असे सांगितले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com