काही राज्यांमध्ये रोख रकमेचा तुटवडा; 'आरबीआय'ने नेमली समिती

file photo
file photo

नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये जाणवणाऱ्या रोख रकमेच्या तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने आज (मंगळवार) एक समिती स्थापन केली. 'काही भागांमधून अचानक आणि नेहमीपेक्षा जास्त व्यवहार झाल्यामुळे काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे', असे निरीक्षण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोंदविले. 

'देशातील रोख रकमेच्या उपलब्धतेचा आढावा घेतला आहे. सध्या आपल्याकडे गरजेपेक्षा अधिकच रोख रक्कम आहे. बॅंकांमध्येही पुरेशी रक्कम आहे. काही भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त आणि तेही अचानक व्यवहार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यावर तातडीने तोडगा काढला जात आहे', असे जेटली यांनी सांगितले. 

नोटाबंदीनंतर काही महिने रोख रकमेचा तुटवडा जाणवला होता. त्यानंतर आता बहुतांश भागांत परिस्थिती पूर्ववत झाली आहे. काही राज्यांमध्ये रोख रकमेची उपलब्धता इतर राज्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे अशा राज्यांमध्ये गेले काही दिवस 'एटीएम'मधून पैसे काढताना अडचणी जाणवत आहेत, असे अर्थ राज्यमंत्री एस. पी. शुक्‍ला यांनी सांगितले. इतर राज्यांकडे असलेली अतिरिक्त रक्कम या राज्यांकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये समितीची स्थापना करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. येत्या तीन दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. 

हैदराबाद, भोपाळ, सुरत, वाराणसी, दिल्ली या शहरांमध्ये रोख रकमेचा तुटवडा काही प्रमाणात जाणवत आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी 'एटीएम'मधील रोकड संपल्यानंतर प्रथमच असा मुद्दा समोर आला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com