(Video) व्यावसायिक-उद्योजकांसाठी सरकार सर्व काही करणार : निर्मला सीतारामन 

(Video) व्यावसायिक-उद्योजकांसाठी सरकार सर्व काही करणार : निर्मला सीतारामन 

पुणे : "अधिकाऱ्यांना कर गोळा करण्याचे लक्ष्य निश्‍चितच आहे. परंतु कर वसुलीच्या लक्ष्यापर्यंत पोचण्यासाठी अधिकाऱ्यांनी व्यावसायिक- उद्योजकांना कोणताही त्रास देऊ नये, असे निर्देश दिले आहेत. तसेच, जीएसटी कमी करण्याबाबत निर्णय घेणे हे माझ्या हातात नसून, जीएसटी समिती यावर निर्णय घेत असते,'' असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. 

सीतारामन यांनी मंगळवारी जीएसटी आणि प्राप्तिकर अधिकाऱ्यांसोबतच व्यापारी-उद्योजकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर, केंद्रीय महसूल सचिव अजय भूषण पांडेय यांच्यासह अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

सीतारामन म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात उद्योजकांच्या बाबतीत स्पष्ट संदेश दिला आहे. देशातील लहान-मोठे तसेच मायक्रो आणि नॅनो उद्योग आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सर्व उद्योगांना बरोबर घेऊन जायची आमची भूमिका आहे. उद्योजकांसोबतच तेथील कर अधिकाऱ्यांच्याही भेटी घेत आहे. उद्योजकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. उद्योजकांना संशयाच्या नजरेने पाहण्यापेक्षा अधिकाऱ्यांनी त्यांचा व्यवसाय सुकर करण्यास मदत करावी. ऑटो उद्योगाला मंदीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी विविध घोषणा केल्या आहेत. आता त्याचा कसा परिणाम होतो हे पाहून पुढील निर्णय घेतले जातील. गेल्या महिन्यात जीएसटी समितीने इलेक्‍ट्रिक वाहनांवरील जीएसटी कमी केला होता. 

आरबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह करणे चिंताजनक 
विमल जालान समितीने केलेल्या शिफारसीनुसार रिझर्व्ह बॅंकेच्या गंगाजळीतील 1.86 लाख कोटी रुपये केंद्र सरकारला मिळणार आहेत. परंतु निधी वापराबाबत अजून निर्णय झालेला नाही. रिझर्व्ह बॅंकेकडे जादा निधीबाबत काय करावे यासाठी जालान यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती रिझर्व्ह बॅंकेनेच नेमली होती. सरकारला किती निधी द्यायचा याचा निर्णय या समितीने घेतला. हा केंद्र सरकारचा निर्णय नाही. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ही चिंताजनक बाब आहे. रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव न घेता त्या म्हणाल्या की,''या समितीमध्ये काही तज्ज्ञ लोक आधी देखील होते. त्यांनीच आता या सदस्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे 'विचित्र' आहे.'' 

राहुल गांधींना जनतेने धडा शिकवला 
रिझर्व्ह बॅंकेने गंगाजळीतील रक्कम केंद्र सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय म्हणजे चोरी करण्यासारखाच आहे, अशी टीका कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. केंद्र सरकारला चोर असल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपाला सीतारामन यांनी चोख उत्तर दिले. केंद्र सरकारवर आरोप करण्याआधी त्यांनी पक्षातील वरिष्ठांसोबत चर्चा करावी. राहुल गांधी हे जेव्हा चोर, चोरी असे मुद्दे बाहेर काढून सरकारवर फक्त आरोप करतात. मात्र, देशाच्या जनतेने त्यांना योग्य धडा शिकविला आहे, असे सीतारामन यांनी नमूद केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com