Loksabha 2019 : इतिहास घडविणार का महाराष्ट्रातील निकाल! 

rahul_modi.jpg
rahul_modi.jpg

अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली उमेदवारांची नावे, स्थानिक राजकारणाला महत्व देत अनेक नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी, पक्षनिष्ठा की घराणेशाही यातून निर्माण झालेले पेच, आरोप-प्रत्यारोप करताना चिघळलेले वाद, मतदार राजासाठी ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक योजनांचा सुकाळ आणि मतदानाच्या कमी- अधिक टक्केवारीमुळे संभ्रमात टाकणारा मतदारांचा कल...! 

यंदाची लोकसभा निवडणुक महत्वपूर्ण ठरली ती सर्वार्थाने. लोकसभा निवडणूक 2019 चा सातवा आणि शेवटचा टप्पा 19 मे रोजी पार पडेल. नरेंद्र मोदी या एका व्यक्तीभोवती केंद्रित झालेली निवडणूक, मोदी विरुद्ध सर्व विरोधी पक्ष अशीच अखेरपर्यंत रंगली. 11 एप्रिल ते 19 मे 2019 याकाळात देशभरात सात टप्प्यात घेण्यात आलेल्या या निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी हाती येईल. महाराष्ट्रात यंदा प्रथमच चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना महायुती अशी थेट लढत झाली. देशाप्रमाणेच, महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूकही अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. सध्या सगळेच राजकीय पक्ष मतदानाच्या टक्केवारीवरून जय-पराजयाचे अंदाज बांधण्यात गुंतले आहेत. मात्र राज्यात "चार टप्प्यांमध्ये' उसळी घेतलेला मतदानाच्या टक्केवारीचा चेंडू नक्की कोणाच्या हातात पडणार आणि कोणाला "चार टप्पा आऊट' करणार हे 23 मे लाच स्पष्ट होईल. 

जाणून घेऊया यंदाच्या निवडणुकीची वैशिष्ट्ये. 

- 48 लोकसभा मतदारसंघात 97640 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. 
- महाराष्ट्रात प्रथमच - 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल - अशा चार टप्प्यात मतदान. 
- पहिल्या टप्प्यात सात तर दुसऱ्या टप्प्यात दहा आणि तिसऱ्या टप्प्यात चौदा तसेच चौथ्या टप्प्यात सतरा मतदारसंघांमध्ये झाले मतदान. 
- एकत्रित निकाल 23 मे 2019 रोजी जाहीर होणार. 
- महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांसाठी 867 उमेदवार निवडणूक रिंगणात. 
- सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, सुनील तटकरे, गिरीश बापट, अनंत गिते, आनंदराव अडसूळ यांसारख्या राज्य व केंद्रातील आजी-माजी मंत्र्यांनी नशीब अजमावले. 
- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच सर्व केंद्रांवर VOTER-VERIFIED PAPER AUDIT TRAIL (VVPAT) व्हीव्हीपीएटी यंत्राचा वापर करण्यात आला. 
- इव्हीएम यंत्रावर प्रथमच उमेदवारांची छायाचित्रे देण्यात आली. 
- इव्हीएम मतदान यंत्रावरील बॅलेट पेपरवर 43 लोकसभा मतदारसंघापैकी 19 ठिकाणी पहिल्या, तर 9 मतदारसंघात दुसऱ्या स्थानावर बसप उमेदवार होते तर 13 ठिकाणी तिसऱ्या व 2 ठिकाणी 4 थ्या स्थानावर बसपने जागा मिळवली आहे. बहुजन समाज पक्ष (बसप) राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांना निवडणूक चिन्ह वाटप व अग्रक्रमात इतर राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांबरोबर नावाप्रमाणे पहिले स्थान मिळाले आहे. 
- इव्हीएम मतदान यंत्रावरील बॅलेट पेपरवर पहिल्या स्थानावर बसप 19, कॉंग्रेस 9, राष्ट्रवादी 4, भाजप 7, शिवसेना 9 मतदारसंघामध्ये होती. 
- आदर्श आचार संहितेचे पालन करण्यासाठी निवडणूक आयोगाने "सिटीझन व्हिजिलन्स' अंतर्गत "सी-व्हिजिल' हे नवे मोबाईल ऍपद्वारे विकसित केले. त्याद्वारे मतदारांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेण्यात आली. 
- 97 राजकीय पक्ष आणि 420 अपक्ष उमेदवारांचा या निवडणुकीत सहभाग. 
- महाआघाडीमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी पक्ष, स्थानिक आघाडी अपक्ष आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार रिंगणात. 
- 48 लोकसभा जागांसाठी महाआघाडीतील कॉंग्रेसचे25 उमेदवार उभे राहिले तर राष्ट्रवादीच्या 19 उमेदवारांनी निवडणूक लढवली. मित्रपक्ष आघाडीला 4 जागा सोडण्यात आल्या होत्या. यामध्ये सांगली, हातकणंगले, अमरावती, पालघर या मतदारसंघांचा समावेश होता. 
- भाजप आणि शिवसेना युतीच्या उमेदवारांमध्ये भाजपच्या 25 आणि शिवसेनेच्या 23 उमेदवारांनी निवडणूक लढवली. 
- इतर राजकीय पक्षांमध्ये प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीने 48 मतदारसंघांत तर बहुजन समाज पार्टीने 47 ठिकाणी निवडणूक लढवली. बहुजन मुक्ती पार्टीने 35 मतदारसंघांत उमेदवार उभे केले. 
- 48 लोकसभा जागांसाठी महाआघाडीने 48 तर भाजप-सेना युतीने 48 मतदारसंघांत तसेच इतर प्रमुख पक्ष-154, इतर राजकीय पक्ष-197, आणि 420 अपक्ष उमेदवारांसह एकूण 867 उमेदवारांनी निवडणूक लढवली. 
- गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सर्वाधिक कमी 5 उमेदवार तर बीड मतदारसंघांत सर्वाधिक 36 उमेदवार संख्या होती. 
- महाराष्ट्रातील एकूण 8 कोटी 85 लाख 64 हजार 592 मतदारांपैकी 5 कोटी 38 लाख 45 हजार 197 मतदारांनी मतदानात केले. 
- मावळ मतदारसंघात सर्वाधिक 13 लाख 65 हजार 861 मतदारांनी मतदान केले तर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघांमध्ये सर्वाधिक कमी 7 लाख 95 हजार 399 मतदारांनी मतदान केले. 
- महाराष्ट्रात एकूण 2405 तृतीयपंथी यांची मतदारसंख्या आहे. यापैकी 603 तृतीयपंथी मतदारांनी मतदानात सहभाग घेतला. 
- राज्यात सरासरी 60.92 टक्के मतदानाचे प्रमाण असून गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 60.61 टक्के प्रमाण होते. 
- गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सर्वाधिक मतदान 71.98% टक्के झाले तर कल्याण मतदारसंघांमध्ये सर्वाधिक कमी 45.28% टक्के झाले. 
- मावळ मतदारसंघात सर्वाधिक 2504 मतदान केंद्र तर कमी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात 1572 मतदान केंद्र होती. 
- शिवसेनेच्या 23 उमेदवारांच्या विरोधात महाआघाडीच्या राष्ट्रवादीचे 11 तर कॉंग्रेसचे 9 आणि मित्रपक्ष 3 ठिकाणी लढत दिली आहे. 
- भाजपच्या 25 उमेदवारांच्या विरोधात महाआघाडीच्या राष्ट्रवादीचे 8 तर कॉंग्रेसचे 16 आणि मित्रपक्षाने एका ठिकाणी लढत दिली आहे. 
- गडचिरोली-चिमूर, दिंडोरी, सातारा, लातूर, नंदुरबार आणि अकोला या मतदारसंघातील निवडणूक निकाल उमेदवारांची संख्या कमी असल्याने सर्वप्रथम हाती येतील अशी शक्‍यता आहे. 
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि "आप' या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रात निवडणूक लढविली नाही. त्यांचा कॉंग्रेस आघाडीला पाठिंबा राहिला. 
या आणि अशा वैशिष्ट्यांमुळेच महाराष्ट्रातील लढत उत्कंठावर्धक ठरली आहे. भाजप-शिवसेना युतीच्या विरूद्ध एकवटलेल्या आघाडीच्या ताकदीला मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो, यावर राज्याच्या राजकारणाची पुढील दिशा निश्‍चित होणार आहे. विधानसभेतील भावी सरकारचे चित्र या निकालाच्या माध्यमातूनच रेखाटले जाणार आहे. 
--- 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com