'बारामती'वर नजर ठेवणार आता हे 'दादा' 

Chandrakant Patil
Chandrakant Patil

पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवून भारतीय जनता पक्षाने हा जिल्हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एका अधोरेखित केले. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांच्या पदरी यामुळे निराशा झाली असली तरी, "बारामती'वर दबाव कायम ठेवण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. 

राज्यमंत्रीमंडळातील वरिष्ठ मंत्र्याकडेच आतापर्यंत पुण्याचे पालकमंत्रीपद राहिले आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, अजित पवार यांनी यावर बरीच वर्षे काम केले. पालकमंत्री म्हणून अजित पवार यांचा सर्वाधिक प्रभाव राहिला. अजितदादा यांच्यानंतर गिरीश बापट यांच्याकडे पालकमंत्रीपद आले. पालकमंत्रीपदाची दादा आणि भाऊ अशी नेहमीच तुलना झाली. बापट यांनी गेली साडेचार वर्षे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा हा योग्य समन्वय साधला. याच पदाच्या काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महत्त्वाच्या महापालिका भाजपकडे आल्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वरचष्मा असणाऱ्या जिल्ह्यात पक्षसंघटना वाढविणे आणि पक्षाला पोषक निर्णय घेत शहर व जिल्ह्याच्या विकासाचा वेग कायम राखण्याचे आव्हान सतत बापट यांच्यासमोर राहिले. पुण्याच्या पाणीप्रश्‍नावर निर्णय घेतानाही बापट यांची कसोटी लागली. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी "पाणीबाणी' हाताळली. बापट खासदार झाल्यानंतर पुण्याचे पालकमंत्रीपद आणि मंत्रिपद जिल्ह्यातील एखाद्या आमदाराला मिळेल अशी आशा होती. अगदी खासदार संजय काकडे यांचेही त्यावर लक्ष्य होते. बारामती लोकसभा निवडणूक लढल्याच्या बदल्यात कांचन कुल यांचे पती आमदार राहुल, पिंपरी-चिंचवड भागाला प्रतिनिधित्व मिळावे याहेतून आमदार लक्ष्मण जगताप, मावळचे आमदार बाळा भेगडे ही नावे मंत्रिपदासाठी सातत्याने चर्चेत होती. जिल्ह्यातील राज्यमंत्री विजय शिवतरे आणि दिलीप कांबळे यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपविले जाईल, अशीही अटकळ बांधण्यात येत होती. पण या केवळ चर्चाच होत्या.

पुण्यासारखे महत्त्वाचे पालकमंत्रीपद ज्येष्ठ नेत्याकडेच असावे, असे मुख्यमंत्र्यांनी पहिल्यापासून ठरवले होते. त्यात चंद्रकांत पाटील हे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांना पुणे पूर्णपणे माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांतदादा यांचा "बारामती'चा खास अभ्यास झाला होता. याशिवाय अजित पवार यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला निवडणुकीच्या काळात तोंड देता यावे, यासाठी दुसरे "दादा'च हवेत असे जिल्ह्यातील काही आमदारांचे मत होते. यासर्व कारणांमुळे पालकमंत्रीपद चंद्रकांतदादांकडे गेले. विधानसभा निवडणुकीला आता केवळ 70-75 दिवस उरले आहेत. दुष्काळाची स्थिती आहे, शहरातील प्रश्‍न वेगळे आहेत. या सर्वांचा समन्वय साधला जावा आणि विधानसभा निवडणुकीसाठी त्याचा फायदा व्हावा याच हेतूने चंद्रकांतदादांची निवड झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com