
पवित्र स्मृतीस नम्रतापूर्वक वंदन करतांना त्यांच्या "वीरमरणाचा" अर्थ आणि त्याची ही पार्श्वभूमी...
Savitribai Phule Death Anniversary: सावित्रीबाई आणि प्लेगची साथ... आलेले वीरमरण
- राजाराम सुर्यवंशी
आज १० मार्च २०२३ ! युगस्त्री सावित्रीबाईंनी आजपासून बरोबर १२६ व्या वर्षांपुर्वी प्लेगच्या अस्मानी साथीत गोरगरीबांची, आपल्या अस्पृश्य बांधवांची सेवा करता करता घोरपडीच्या मैदानावर उभारलेल्या डॉ. यशवंताच्या हॉस्पिटल्समध्ये प्राण सोडला होता.
त्यांच्या पवित्र स्मृतीस नम्रतापूर्वक वंदन करतांना त्यांच्या "वीरमरणाचा" अर्थ आणि त्याची ही पार्श्वभूमी...
आजच्या आमच्या शहरी युवकांना शंभर सव्वाशे वर्षांपुर्वीची अस्पृश्यता व तिचे दाहच चटके यांची कल्पना नसावी. आजपासून सव्वाशे वर्षांपूवी सावित्रीबाईंचा प्लेगच्या साथीत झालेला मृत्यु हा नुसत्या अस्मानी संकटाचा बळी नव्हता, तर धर्म-जातिव्यवस्थेचाही त्यात समान वाटा होता.
कारण की, प्लेगने पुण्यात ऐवढा थैमान घातला होता की, ब्रिटिशांनी उभारलेले पुण्याचे प्लेग हॉस्पिटल त्यासाठी अपुरे पडत होते. त्यात भर पडत होती वर्ण-जातिव्यवस्थेची!
शुद्रातिशुद्र समाजातील बाधित रोग्यांना कोणीही उच्चवर्णीय वैद्य हात लावत नव्हता. वा उपचार करत नव्हता.
अशावेळी सावित्रीबाईंनी आपल्या डॉक्टर पुत्राला अहमदनगरवरुन बोलावून घेतले व त्याला त्यांच्या व्हायींच्या अर्थात ससाणेंच्या घोरपडीच्या माळरानावर कुडाचे हॉस्पिटल उभारायला लावले होते.
व तेथे या माय-लेकांनी स्पृश-अस्पृशांची प्लेगने बाधित रोग्यांची अविरत सेवा आरंभली होती. परंतु काळ मोठा निष्ठुर झाला होता.
पुण्याच्या आसपासच्या शुद्रातिशुद्रांच्या वस्ती-वाड्यांवर फिरुन सावित्रीबाई स्वतः रोग्यांना घोरपडीला वाहून नेत होत्या व त्यांना जगवण्याचा शर्तीचा प्रयत्न ही माय-लेकांची जोडी करत होती.
मुंढव्याच्या पांडुरंग बाबाजी गायकवाडला अशीच रोगाची लागण झाली असता, तो अस्पृश्य असल्यामुळे कोणीही सवर्ण वैद्य त्याला तपासायला तयार नव्हते.
अशावेळी सावित्रीबाई पुढे आल्या. त्यांनी आपल्या पाठीवार पांडुरंगाला घेऊन घोरपडी हॉस्पिटलचा रस्ता धरला होता.
सावित्रीबाईंनी तेव्हा वयाची सहासष्टी ओलांडली होती. गरीबीने शरीर पिचले होते. रामचंद्रपंत धामणस्कर व मामा परमानंदांच्या शिष्टाईने सावित्रीबाईंना दरमहा ठराविक रक्कम पेंशन स्वरुपात प्राप्त होईल, अशी व्यवस्था बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाडांनी केली होती. त्यावर सावित्रीबाईंचे उर्वरित जगणं व समाजकार्य सुरू होते.
त्यात जातिव्यवस्थेचा बहिष्कार ! हा थकला भागला जीव या बहिष्काराने अधिकच रंजला गंजला होता. अशा बिकट अवस्थेत प्लेगच्या अस्मिनी संकटाशी त्या आपल्या शरीरातील उरली सुरली ताकद एकवटून स्वतः जगत होत्या व इतरांनाही जगवत होत्या.
त्या गौतम बुध्दांचं तत्वज्ञान जगत होत्या! त्यांचे ध्येय, विचार व मानवप्राण्याप्रती त्यांच्या ह्रदयातील असिमप्रेमाला सीमा नसली तरी, त्यांचे शरीर निसर्गनियमांनी बांधलेले होते.
त्याला निर्सगाच्या मर्यादा होत्या. त्यात अस्मानी व जातिव्यवस्थाक संकटांची भर पडू ते अधिक खंगून गेल्या होत्या. अशा भयाण ऐकाकी अवस्थेत त्या कशा जगल्या असतील हे त्या व तो निर्मिक जाणोत !!
पांडुरंगाला डॉ.यशवंताच्या हवाली करुन त्या यशवंताला मनातल्या मनात पुटपुटल्या. आमचा राम राम घ्यावा !! .' आम्ही जातो आमच्या गावा ....! एवढं पुटपुटून त्या यशवंताच्या पायाजवळ कोसळल्या..!. डॉ. यशवंतावर अकस्मात आभाळ कोसळले.
एकीकडे कर्तव्य व दुसरीकडे ममता !! अशा चक्रव्हुवात तो सापडला. परंतु जोति सावित्रीच्या या लेकाने विवेक गमावला नाही. पांडुरंग व माऊली दोघांवर उपचारांची शर्थ केली! पांडुरंगाचे तरुण शरीर औषधोपचाराला प्रतिसाद देत होते!, परंतु त्यांच्या आईचे जीर्ण शरीर मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना साद घालतं नव्हते!
वसंत रुतूचा संकेत डॉक्टरांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही!! पानगळती होऊन नवा बहर बहरुन येत होता. दुसऱ्या दिवशी पांडुरंग रुपी नवं पान उमलून फुलून आलं होतं.. पण सावित्रीमाईरुपी जीर्ण पान गळून पडलं होतं...! भर वसंतात यशवंताच्या जीवनात भयान वाळवंट पसरु लागले होते ! दूर दूरपर्यंत कुठलाच विसावा दिसत नव्हता ...!
मात्र, जोती सावित्रीबाईंच्या त्यागाने, त्यांच्या शिक्षा, संस्कार, विद्रोह, सत्यशोधकी विचारधारा, सत्यशोधक समाज, सार्वजनिक धर्माबरोबर त्यांना आलेल्या वीरमरणाने हे 'जग ' नवीन जीवन जगू लागले होते ...!!..