world art day : असं म्हणतात की प्रत्येकाला एक ना एक कला अवगत असावी. कलेविना माणसाचं आयुष्य हे अगदी रिकाम्या झोलीप्रमाणे असतं कारण कला ही माणसाला जगायला शिकवते..व्यक्त व्हायला शिकवते पण काळानुसार कला ही जितकी उंचावली आहे तितकाच कलाकार मात्र हरवलेला आहे.
जशी कला जीवंत असते तसा कलाकार का जीवंत राहत नाही? मग तो कलाकार अभिनेता असो, मुर्तिकार असो, गायक असो की चित्रकार किंवा आणखी काही. कलेचं आयुष्य जसं मोठं आहे तसं कलाकाराचं का राहत नाही. आजही कित्येक कलाकार वयानुसार पडद्याचे मागे गेले की कलाकाराची किंमत कमी होताना दिसते.
उदाहरण म्हणजे आपली सिनेसृष्टी एखादा कलाकार जेव्हा त्याच्या सुवर्ण कारकिर्दीत एकामागून एक हिट चित्रपट देत असतो. तेव्हा जिकडे तिकडे त्याचे पोस्टर्स लावले जातात, अनेक ब्रॅंड त्याच्या मागे मागे धावतात पण याच कलाकाराचं जेव्हा वय होतं.. मग हातातून काम कमी होत जातं.. तेव्हा त्या कलाकाराप्रती क्रेझ कमी होताना दिसून येते. ही खूप मोठी शोकांतिका आहे. कलाकाराची किंमत कधीच कमी होता कामा नये कारण कला जीवंत ठेवण्याचं पुण्यवान काम कलाकार करत असतो.
आणखी एक उदाहरण म्हणजे मुर्तीकारांचं.. मुर्ती बनविणारे कलाकार असंख्य मुर्ती बनवतात. त्या कलेतून आपलं पोट भरतात. ती कला वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतात. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ती कला जोपासतात पण त्या कलाकाराची किंमत काय असते ५००, १०००, २०००, ५००० रुपये. कलेवर अख्ख आयुष्य प्रेम करणाऱ्या कलाकाराच्या आयुष्याविषयी कधीच फारसा विचार केला जात नाही.
हल्ली ना.. क्रेझ हा नवा शब्द आलाय. कलाकाराविषयी लोकांना क्रेझ असते. ती क्रेझ संपली की कलाकार त्यांच्या दृष्टीने नाहीसा होतो किंवा एखादा नवा कलाकार आला की जुना कलाकार नकोसा वाटतो, ही जी मानसिकता आहे ती खरोखर बदलायला हवी कारण कलाकार जुना झाला म्हणजे त्याच्यातली कला कधीच मरत नाही.
अगदी मातीचे मडके बनविणारे कलाकार असो की भिंतीवर चित्र काढणारे, पोस्टरवर रंगकाम करणारे कलाकार असो की टिव्ही, सिनेमा किंवा नाटकात काम करणारे कलाकार असो, संगीत क्षेत्रातले कलाकार असो की विणकाम करणारे असो किंवा कोणतेही कलाकार असो.. त्या कलाकारांचा सन्मान करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांची किंमत करणे खूप जास्त गरजेचं आहे.
ज्या दिवशी एक कलाकार स्वत:ची व्यथा मांडणं सोडणार, त्या दिवशी कलेचा खरा विजय होणार.. हल्ली कलाकाराच्या व्यथा तुम्ही अनेकदा न्युजच्या माध्यमातून बघता, वाचता.. पण ही गोष्ट समजून घेणे तितकीच महत्त्वाची आहे की कलेला जीवंत ठेवण्याच्या प्रयत्नात कलाकार मात्र संपायला नको.
मुळात आपल्या देशात कलेची किंमत आहे.. कलेला वाव ही मिळतो पण कलावंतांची किंमत नाही...हे इथलं दुर्दैव आहे आणि याविषयी चिंतन मंथन करायला आजचा विश्व कला दिवसच योग्य आहे, असं मला वाटतं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.