लिंगायत धर्माला हवी स्वतंत्र मान्यता 

लिंगायत धर्माला हवी स्वतंत्र मान्यता 

1105 साली जन्मलेल्या बसवण्णांनी बहिणीला मुंज नाकारल्याने आठव्या वर्षी गृहत्याग केला. 20 व्या वर्षापर्यंत कुंडलसंगम येथे पौराणिक स्थावर लिंगाची सेवा केली; परंतु त्यातून विकार मुक्ती निष्फळ ठरल्याने वैदिक परंपरेचा त्याग केला. काही काळ ध्यान केल्यानंतर त्यांनी अवैदिक तत्त्वांची मांडणी केली. यात त्यांनी जनन सुतक, कुलसुतक, रजसुतक, उच्छिष्ट सुतक आणि प्रेत सुतक अशी पंच सुतके मांडली. पण त्यांनी तीही नाकारली व मनाचा विकार हेच सुतक आहे, अशी मांडणी केली. हे सुतकरुपी विकार जाणण्यासाठी आणि त्यातून मुक्त होण्यासाठी गुरूलिंग जंगम तत्त्व त्यांनी सांगितले.

विकाराला जाणणे, शुद्ध आचरण ठेवणे आणि साधनेतून प्राप्त होणाऱ्या ज्ञानातून मुक्ती मिळवणे म्हणजेच हे गुरुलिंग जंगम तत्त्व. ही मनाची शुद्धी करण्याची प्रकिया आहे. स्वत:तील ईश्‍वरी अंतरंग जाणणे म्हणजेच धर्म आहे, असे त्यांनी सांगितले. यातून त्यांनी एकेश्‍वर उपासना तत्त्व दिले. अंतर्मुख होण्यासाठी चैतन्य भक्ती ज्ञान मार्ग दिला. 

मनाच्या विकारातून मुक्त होणे हाच धर्म असे त्यांनी सांगितले. इष्टलिंग साधनेतून विकार नष्ट करण्याची प्रक्रिया सांगितली. यात इष्टलिंगाला साक्षी ठेऊन मनातील अनिष्ट विकार इष्टलिंगाला अर्पण करण्याचा नुतन भक्ती मार्ग सांगितला. ही जीवन आचरणाची प्रणाली पुढे लिंगायत धर्म म्हणून उदयास आली. याचे आचरण करणारे अनुयायी लिंगायत होत. यात ब्राह्मणांपासून ते दलितांपर्यंत 350 जाती व पोट जातींचा समावेश आहे. यात काही राजे राजवाड्याचाही समावेश होता.

वैदिक परंपरा त्याग करून एकत्र आलेल्या या अनुयायांनी दुःख व विकारातून मुक्त होण्यासाठी बसवण्णांकडे धर्माची मागणी केली. यात सोलापूरचे सिद्धरामेश्‍व, अक्कमहादेवी, मुक्तांबिका, राजा मोळगी मारय्या यांचा प्रामुख्याने समावेश होता. पुढे 770 स्त्री पुरुषांनी अनुभव मंडपात बसवण्णांच्या अधिपत्याखाली धर्माच्या तत्त्वज्ञानाची वचन साहित्याद्वारे मांडणी केली. याच लिंगायत धर्माच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, बहुदेवता उपासना, वर्ग कलह, अस्पृषता, स्त्री दास्यत्व श्रमजिवींची पिळवणूक, पुरोहितवादी मतांधता, होमहवन, लग्न कार्यातील उधळपट्टी अशा विविध समस्यांची सोडवणूक केली. "श्रम हिच पुजा' हा सिद्धांत याच तत्वज्ञानातून दिला. 

मात्र कालांतराने वचन साहित्याचा प्रचार-प्रसार थोपवला गेल्याने आणि लिंगायत धर्मात पुरोहीतशाहीचे वर्चस्व निर्माण झाल्याने मुळ लिंगायत धर्माच्या स्वरूपाला बाधा लागली. पुरोहितशाहीकडून आपले अर्थकारण सांभाळण्यासाठी लिंगायत धर्मातील संकल्पना पुसट होत गेल्या. या तत्त्वांची पुर्नउजळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळायला हवी. 

दरम्यान, ब्रिटीश राजवटीत जनगनणेमध्ये लिंगायतांची स्वतंत्र जनगणना होत होती. स्वातंत्र्यानंतर मात्र धर्माचा उल्लेख न झाल्याने शासन दरबारी धर्माची ओळख पुसट झाली आहे. ही ओळख ठळक करण्यासाठी आणि धर्म जागृतीसाठी स्वतंत्र धर्माची मान्यता मिळायला हवी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com