
भिगवण पासून अगदी १३ किलिमीटर अंतरावर उजनी धरण्याच्या पाणलोट क्षेत्रात पळसनाथ मंदिर शतकानुशतके तसेच उभे आहे. हे मंदिर शके १०७९ म्हणजेच सन ११५७ मध्ये उभारण्यात आले असून बांधकाम ह्यामध्ये पूर्वी शंकरांची पिंड होती परंतु, हे मंदिर जवळजवळ वर्षभर पाण्याखाली असल्याने गावकऱ्यांनी ह्या मंदिरातील हे शिवलिंग गावामध्येच दुसरीकडे मंदिर बांधून स्थापन केले आहे.
शाळांना सुट्ट्या लागतात न लागतात तोच पालकांची मुलांना उन्हाळाच्या सुट्टीमध्ये कुठे नेऊ आणि कुठे नाही असे वाटू लागते. पर्यटन स्थळ शोधण्यापासून, बुकिंग पर्यंत अशा उत्साही मंडळीची लगबग सुरु होते. त्यात जर आपण महाराष्ट्रसारख्या संपन्न राज्यात राहत असू तर मग विचारायलाच नको, अगदी गड, किल्ले, समुद्र किनारे किंवा अगदी कोणतेही रिसॉर्ट आणि अगदी काहीच नाही जमलं तर, शहरांमधील मोठाले मॉल्स आणि जर आई वडील वर्किंग असतील तर मग पाल्याला कोणत्यातरी समर कॅम्प मध्ये 'एंगेज' कस करता येईल हे तर नक्कीच पाहिलं जातं. परंतु आज अनेकांकडे वाहनांची सुविधा असल्याने अगदी पूर्वी सारखं महाराष्ट्र परिवहन असो व रेल्वे इत्यादींच्या वेटिंग लिस्टवर अवलंबून न राहता, आपली ट्रिप कन्फर्म करण्याएवढे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
असंच पुणे असो किंवा मुंबई एक दिवसीय पर्यटनासाठी तुम्ही कोणतीतरी युनिक जागा शोधत असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर 'पळसनाथ' येथे नक्की भेट द्या. पुण्यातून पुणे - सोलापूर महामार्गावर १३० किलोमीटरचे अंतरावर हे मंदीर आहे. पुण्यातून बाहेर पडताच मांजरी येथील फार्म्स, पुढे बार्शी, पाटस, दौंड, भिगवण अशी गावे लागतात. भिगवण हे जरी पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध ठिकाण असले तरी देखील हे ठिकाण येथील गोड्या पाण्यातील मासे थाळीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे.
भिगवण पासून अगदी १३ किलिमीटर अंतरावर उजनी धरण्याच्या पाणलोट क्षेत्रात पळसनाथ मंदिर शतकानुशतके तसेच उभे आहे. हे मंदिर शके १०७९ म्हणजेच सन ११५७ मध्ये उभारण्यात आले असून बांधकाम ह्यामध्ये पूर्वी शंकरांची पिंड होती परंतु, हे मंदिर जवळजवळ वर्षभर पाण्याखाली असल्याने गावकऱ्यांनी ह्या मंदिरातील हे शिवलिंग गावामध्येच दुसरीकडे मंदिर बांधून स्थापन केले आहे.
सन १९७५ साली या भागात उजनी धरण बांधण्यात आले. त्यावेळी हे मंदिर पाण्याखाली गेले. गेल्या काही वर्षात या भागात दुष्काळ पडल्याने पाणी ओसरताच हे मंदिर पर्यटकांसाठी खुले होते. साधारण फेब्रुवारी ते जून महिन्याच्या सुरवातीला या मंदिरात प्रवेश करता येतो. तसेच याच भागात विष्णूमंदिर देखील आहे. येथील गावातून एक छोटासा रस्ता या मंदिरापर्यंत जातो. येथून अगदी रास्त दरात बोटीमधून हा पाणवठा ओलांडून मंदिरापर्यंत जात येते.
मंदिरात प्रवेश करताच सुबक अशी शिल्प नजरेस पडतात. अनेक दगडांवर विविध प्रकारची फुले, पाने , सुरसुंदरी दृष्टीस पडतात. त्याचबरोबर येथे हनुमानाची मूर्ती देखील आहे. जवळ जवळ वर्षभर हे मंदिर पाण्यामध्ये असते. तरीही येथील शिल्प अजूनही रेखीव आणि सुंदर आहेत. तसेच येथील दगडांवर दुसरा दगड एका विशिष्ट्य पद्धतीने घासतातच सप्तसुरांचा देखील नाद ऐकू येतो. येथील कळस अजूनही शाबूत आहे आणि तसेच मंदिराच्या वरील घुमटाचा भाग पोकळ असल्याने त्याच्या आत प्रवेश करता येतो. आता मंदिरातील काही भाग जीर्ण पावला आहे. त्यामुळे ऱ्या अर्थाने या मंदिराची योग्य ती पाहणी करून अशा ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची गरज आहे. मंदिर परिसरात शंख - शिंपल्यांचा खच पडलेला दिसतो आणि म्हणूनच येथे असंख्य पक्षी पाहावयास मिळतात. हे पाणलोट क्षेत्र गोड्या पाण्यातील माशांसाठी खूप प्रसिद्ध आहे . येथे 'चिलाप' या जातीच्या मासे मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे येते अनेक मच्छिमार जाळे लावून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतात.
मंदिर परिसरात पाण्याची पातळी कमी झाल्याने बऱ्याच ठिकणी दलदल आढळते. यामध्येच अनेक मासे, जिवंत शिंपले आढळून येतात. त्याचमुळेच याठिकाणी हजारोंच्या संख्येमध्ये अनेक स्थलांतरित पक्षी आपल्या नजरेस पडतात. हे पाणलोट क्षेत्र म्हणजे पक्षी निरीक्षकांसाठी मोठी पर्वणीच आहे. या ठिकाणी सूर्यास्ताचा मोहक दृश्य देखील पहायला मिळते. तसेच विविध देशांमधून आलेले हे स्थलांतरित पक्षी, मुख्यतः बगळा, करकोचा, टिटवी, शेकाट्या, फ्लेमिंगो सारखे पक्षी एकतर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ४ नंतर जास्त संख्येने पाहावयास मिळतील. भिगवण येथे अगदी स्वस्त दरात मनसोक्त मच्छी थाळीचा आस्वाद घेऊ शकता.
कुटुंबासह अगदी कमी खर्चात ११ व्या शतकात बांधलेल्या वास्तूला भेट देऊन त्याचसोबत तुमच्या जिभेचे चोचले पुरवत , पक्षी निरीक्षणाचे नयनसुख घेऊ शकता. म्हणूनच मुलांच्या सुट्ट्या संपायच्या आधी आणि हे मंदीर पावसाळ्यामध्ये पुनः एकदा पाण्यामध्ये जाण्यापूर्वी ह्या परिसराला नक्की भेट द्या.