
Shiv Puran : इतर कुठे नाही पण, या 4 ठिकाणी माणसाने गपचूप सहन करावा अपमान...
Hindu Religion Philosophy : बऱ्याचदा कोणी आपल्याशी जरा चढ्या आवाजात किंवा नको त्या शब्दात नको ते बोललं की आपल्याला अपमान झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे आपल्याला समोरच्याचा राग येतो. बऱ्याचदा आपण तो तेव्हाच व्यक्त करून दाखवतो. कधी अपमानाचं उत्तर अपमानाने देतो. कधी शब्दातून तर कधी कृतीतून.
पण आपल्या तत्वज्ञानात सांगितलं आहे की, अपमान होईल असं कधी वागू किंवा बोलू नये. तसंच जर कोणी अपमान केला तर राग येऊ देऊ नये कारण अहंकारातून राग निर्माण होतो आणि अहंकार माणसाच्या अधोगतीला कारणीभूत होतो. पण म्हणून सतत अपमान सहन करत बसणेही योग्य नाही हे देखील आपल्याला काळ शिकवतो. त्यामुळे तारतम्य बाळगून माणसाने राहणे आवश्यक असते.
पण काही ठिकाणी अपमान सहन करण्यातच माणसाची प्रगती असते. त्यामुळे शिव महापुराणात असे ४ ठिकाणं सांगितले आहेत जिथे इच्छा असो वा नसो अपमान सहन करण्यातच माणसाचे भले असते. ते कोणते जाणून घेऊया,
आईसमोर
आई मुलांच्या नेहमी कल्याणाचीच इच्छा करते. त्यामुळे आई त्यांना नेहमी चांगल्यासाठीच रागवते. आईच्या त्या रागवण्याला किंवा चीडचीडीला अपमान न समजता त्यामागची भावना समजून घेतली तर नेहमीच कल्याण होते.
वडिलांसमोर
वडिल वयाने, अनुभवाने आपल्यापेक्षा मोठे असतात. ते आपल्या भल्याचाच विचार करत असतात. त्यामुळे रागात त्यांच्या तोंडून निघालेल्या शब्दांचा अपमान वाटून घेऊ नये. त्यांनी आपल्यासाठी अनेक कष्ट सोसलेले असतात. त्याची जाणीव ठेवावी.
गुरू, शिक्षकांसमोर
प्रामाणिकपणे, मनापासून मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंनी / शिक्षकांनी काही कठोर शब्द बोलले तरी त्याचा अपमान मानून घेऊ नये. त्यांनी आपल्याला ज्ञान संपन्न केलेलं असतं. त्यांच्या या कठोर शब्दांतूनही आपण शिकणे गरजेचे असते.
देवाच्या मंदिरात
देवाच्या मंदिरात आपण मनःशांती मिळवण्यासाठी जातो. जर तिथे आपल्याशी कोणी चुकीचं बोललं किंवा धक्का वगैरे मारला म्हणून राग मानून मनःशांती घालवू नये. ते तिथे विसरून सोडून द्यावे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.