अशी झाली होती 20 वर्षांपूर्वी आपल्या पायलटची सुटका!

abhinandan-vardhaman
abhinandan-vardhaman

नवी दिल्ली -  भारतीय वैमानिक अभिनंदन वर्तमान पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारगिल युद्धाच्यावेळी 26 वर्षीय फ्लाइट लेफ्टनंट के. नचिकेत पाकिस्तानच्या ताब्यात होते. काही आठवड्यानंतर त्यांना भारताकडे सोपवण्यात आले होते. कारगिल युद्धादरम्यान जी. पार्थसारथी पाकिस्तानमध्ये भारताचे राजदूत होते. पार्थसारथी 1963 ते 1968 या कालावधीत भारतीय लष्करात अधिकारी होते. नचिकेत यांची ज्या पद्धतीने सुटका झाली त्यासंदर्भात पार्थसारथी यांनी 'बीबीसी'ला माहिती दिली आहे. 

ज्या पद्धतीने नचिकेत यांची सुटका करण्यात आली त्याच धर्तीवर अभिनंदन यांची सुटका करण्यात येऊ शकते असे पार्थसारथी यांनी सांगितले आहे.

युद्धकैदींवर जीनिव्हा कराराच्या अटी लागू होतात. या करारानुसार पाकिस्तानला आपल्या वैमानिकाबरोबर माणुसकीच्या भावनेतून वागणे अनिवार्य आहे.

नचिकेत यांची अशी झाली होती सुटका
कारगिल युद्धाच्यावेळी फ्लाइट लेफ्टनंट नचिकेत मिग एअरक्राफ्टमध्ये होते. एलओसी म्हणजेच नियंत्रण रेषा ओलांडू नका असे त्यांना आदेश देण्यात आले होते. युद्धादरम्यान त्यांनी मिग विमानाद्वारे आक्रमण केले. जेव्हा ते खाली आले तेव्हा पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेतले.

नचिकेत यांना ताब्यात घेतल्यानंतर काही दिवसांनी पार्थसारथी यांना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक संदेश देण्यात आला. त्यात भारतीय सैनिक नचिकेत यांची सुटका करण्यात यावी असे पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले होते. हे त्यांचे सद्वर्तन होते असे पार्थसारथी म्हणाले. 

त्यानंतर फोनवरुन पार्थसारथी यांना 'आम्ही नचिकेत यांची सुटका करू इच्छितो. असे सांगण्यात आले. त्यानंतर पार्थसारथी यांना जिन्ना हॉलमध्ये येण्यास सांगण्यात आले. परंतु, तेथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी याला पार्थसारथी यांनी नकार दिला. तसेच युद्धकैदींची सुटका होत असताना प्रसारमाध्यमांची उपस्थिती आम्ही स्विकारू शकत नसल्याचे पार्थसारथी यांनी सांगितले. जगभरातील प्रसारमाध्यमांसमोर त्यांना एक उदाहरण म्हणून सादर करण्यात येत असेल तर ते आम्ही स्विकारणार नाही असेही पार्थसारथी यांनी सांगितले. खाजगी बैठकीत नचिकेत यांना आमच्याकडे सोपवावे असेही पार्थसारथी यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.

त्यानंतर नचिकेत यांची सुटका कशी केली जावी यासंदर्भात विचारणा करणारा फोन पार्थसारथी यांना पाकिस्तानकडून आला. आमचा तुमच्यावरचा विश्वास उडाला असून, तुम्ही नचिकेत यांना दूतावासात सोडा. तिथून आम्ही त्यांना घेऊन जाऊ. असे पार्थसारथी यांनी सांगितले. त्यानंतर नचिकेत यांना दूतावासात आणण्यात आले. 

रात्री नचिकेत यांना एअर कमांडर जैस्वाल यांच्या घरी ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांची व्यवस्था एका गाडीत करण्यात आली. त्यांच्याबरोबर वायू आणि नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. वाघा बॉर्डरवर त्यांना भारताकडे सुपुर्द करण्यास सांगण्यात आले. नचिकेत एक-दोन आठवडे पाकिस्तानच्या ताब्यात होते. नचिकेत यांना वाईट वर्तणुकीला सामोरे जावे लागलेले नाही. असेही पार्थसारथी यांनी सांगितले.

मिडियात पायलटचा फोटो जाहीर करणे, तसेच हात बांधून त्यांचा व्हीडिओ जारी करणे हे आंतरराष्ट्रीय युद्धनीतीविरुद्ध आहे असेही पार्थसारथी यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com