पुढील निवडणूक घराणेशाही गाडून टाकणारी: अमित शहा

amit shah
amit shah

नवी दिल्लीः "पुढील लोकसभा निवडणूक साधीसुधी निवडणूक नसून ती निवडणूक 1977 प्रमाणे युग बदलणारी असेल. घराणेशाही, लांगूलचालन व जातीयवादाच्या कबरींवर अखेरचा खिळा ठोकणारी ती निवडणूक असेल. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज व्हावे,'' अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज राजधानी परिक्षेत्रातील बूथप्रमुखांचा उत्साह वाढविला.

भाजपच्या बूथप्रमुखांच्या या बैठकीस संघटनमंत्री रामलाल, दिल्ली प्रभारी शाम जाजू व प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी हे उपस्थित होते. या बैठकीत रामलाल यांनी "बूथ जिंका, निवडणूक जिंका' असा मंत्र कार्यकर्त्यांना दिला.

शहा म्हणाले, "2014 मध्ये दिल्लीतील सातही लोकसभा जागा भाजपने जिंकल्या होत्या व पुढच्या वर्षी त्याचीच पुनरावत्ती करण्यासाठी बूथप्रमुखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही पक्षातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहात. भाजपसारख्या पक्षासाठी सामान्य कार्यकर्ता कायम अमूल्य असतो.''

"दिल्लीत भाजपचा मुकाबला ज्या "आप' व कॉंग्रेसबरोबर आहे त्या पक्षाचे नेते कायम खोटे बोलत फिरतात हे तुम्हाला दिल्लीवासीयांना पटवून द्यावे लागेल. अब्जावधी रुपयांचे गैरव्यवहार करणाऱ्या, बंद पडलेल्या नॅशनल हेरल्डच्या माध्यमातून कोट्यवधी संपत्ती कमावणाऱ्या कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी रोज "राफेलऽराफेल' असे निर्लज्जपणे ओरडत आहेत. पण सर्वोच्च न्यायालयानेच "दूध का दूध' करून यांचे सारे आरोप खोटे ठरविले. आता यांना न्यायालयाचाही आदर नाही हे भाजपने लोकांना सांगायला हवे,'' असे शहा म्हणाले.

"मौनी बाबा पंतप्रधान होते तेव्हा पाकिस्तान रोजच्या रोज भारतीय जवानांचा अपमान करत असे, उरी हल्ल्यानंतर भारताने पाकच्या घरात घुसून बदला घेतला. राहुल गांधी व त्यांची बी टीम (आप) यांना भारतीयांपेक्षा घुसखोरांची जास्त चिंता आहे. आम्ही वेचून वेचून घुसखोरांना देशाबाहेर घालविणार आहोत,'' असे सांगून ते म्हणाले, "1984 च्या शीखविरोधी दंगलीतील पीडितांना मोदी सरकारनेच न्याय मिळवून दिला आहे. दिल्ली विधानसभेत जी घटना घडली ती दंगलग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळणारी होती. केजरीवाल यांच्या पक्षाला त्याबद्दल लाज वाटायला पाहिजे. आम आदमीच्या नावाने झेड प्लस सुरक्षेत वावरणाऱ्या, सरकारी निवासात राहणाऱ्या केजरीवालांच्या 500 नव्या शाळा कोठे आहेत ? मोहल्ला क्‍लिनिक कोठे आहेत ? तेथे कुत्री मांजरी बसलेली असतात, पण रुग्ण व डॉक्‍टर फिरकत नाहीत. दिल्लीच्या 50 टक्के जनतेला दुर्गंधीयुक्त पाणी प्यावे लागते आहे. डीसीटी बसमध्ये मार्शलही नेमलेले नाहीत आणि कोठे सीसीटीव्ही कॅमेरेही लागले नाहीत. या साऱ्या खोट्या आश्‍वासनांचा जाब दिल्लीकरांनी केजरीवाल यांना विचारला पाहिजे.''

देशभर संमेलने
दिल्लीतील निवडक 20 ते 22 हजार बूथप्रमुख बैठकीला उपस्थित होते असे शाम जाजू यांनी "सकाळ'ला सागितले. ते म्हणाले, ""बूथप्रमुखांच्या संमेलनांची सुरवात राजधानीतून झाली आहे. आगामी काळात देशाच्या प्रत्येक राज्यात अशी संमेलने होणार आहेत. केवळ चमकोगिरीने व घराण्याच्या नावावर सत्ता येत नसते. कठोर संघर्ष करूनच सत्ता पुन्हा मिळते हे भाजप कार्यकर्त्यांनी 1980 पासून दाखवून दिले आहे. 2019 देखील त्याला अपवाद नसेल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com