हरियानात शांततेत ६५ टक्के मतदान

हरियानात शांततेत ६५ टक्के मतदान

चंडीगड/नवी दिल्ली - हरियाना विधानसभा निवडणुकीसाठी आज सायंकाळी सहापर्यंत सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. मतदानाची वेळ संपल्यानंतरही काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. त्यांचे मतदान झाल्यावर अंतिम आकडेवारी समजेल. 

नूह येथील घटना वगळता, अन्यत्र मतदान शांततेत पार पडले. १०५ महिलांसह १,१६९ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात १९ हजार ५७८ मतदान केंद्रे होती, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अनुराग अग्रवाल यांनी सांगितले; तर सुरक्षेसाठी ७५ हजारांपेक्षा जास्त जवान तैनात होते, अशी माहिती पोलिस महासंचालक मनोज यादव यांनी दिली. 

मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार दुसऱ्यांदा सत्तास्थापनेसाठी कौल आजमावत आहे. विधानसभेच्या ९० जागांपैकी सध्या भाजपचे ४८ सदस्य आहेत. २०१४मध्ये राज्यात ७६.५४ टक्के; तर यंदाच्या मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत ७०.४६ टक्के मतदान झाले होते.

मुख्यमंत्री खट्टर सायकलने मतदान केंद्रावर
हरियाना विधानसभेत मतदान करण्यासाठी आज मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी रेल्वेतून चंडीगड ते कर्नाल प्रवास केला आणि तेथून ते सायकलने मतदान केंद्रावर पोचले. हरियाना विधानसभेच्या ९० जागांसाठी आज मतदान पार पडले. मुख्यमंत्री खट्टर यांनी आज सकाळी चंडीगड ते कर्नाल जनशताब्दीने प्रवास केला. त्यानंतर ते ई-रिक्षाने रस्त्यापर्यंत गेले आणि तेथून ते सायकलने मतदान केंद्रावर पोचले. ६५ वर्षांचे खट्टर यांनी दोन तासांच्या रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांशी संवाद साधला. या वेळी अनेकांनी आपले अनुभव शेअर केल्याचेही खट्टर यांनी ट्विटरवर म्हटले आहे. मुख्यमंत्री पदावरील व्यक्तींनी कधी कधी साध्या व्यक्तीप्रमाणेच वागायला हवे. या कृतीने समाजात चालणाऱ्या घडामोडींची माहिती मिळते, असे खट्टर यांनी म्हटले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com