बेळगाव जिल्ह्यात वर्षात सुमारे तीन लाख ६७ हजार टन फळ उत्पादन

बेळगाव जिल्ह्यात वर्षात सुमारे तीन लाख ६७ हजार टन फळ उत्पादन

बेळगाव - जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरीही दोन वर्षात बेळगाव जिल्ह्यात विविध फळांच्या उत्पादनात 28 टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. एक वर्षात 3 लाख 67 हजार मेट्रिक टन फळांचे उत्पादन झाले आहे.

फळ उत्पादन शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असून बाजारातही फळांना मागणी वाढली आहे. तसेच फळांना दरही चांगला मिळत असून बाजारात दररोज विविध प्रकारची फळे उपलब्ध होत आहेत त्यामुळे नागरिकांकडून फळांची खरेदीही अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे विक्रेत्यांकडेही गर्दी पहावयास मिळत आहे.  

बेळगाव जिल्ह्यात एकूण 6 लाख 78 हजार हेक्टरवर विविध प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. तर जिल्ह्यातील विविध भागात डाळींब, द्राक्षे, पेरू, केळी, लिंबु, आंबा, सीताफळ, कलिंगड या फळांचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात   पावसाळ्यात काही भागात अतिवृष्टी झाली तर काही तालुक्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते, त्यामुळे यावेळी फळांच्या उत्पादनात कमी येईल अशी भीती फलोत्पादन खात्याकडुन व्यक्त करण्यात येत होती. मात्र अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी असूनही जिल्ह्यातील उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.

गेल्या 5 वर्षात जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात फळांचे उत्पादन घेण्यात आले आहे. जिल्ह्यात 6 लाख 78 हजार हेक्टरवर शेती केली जाते. यापैकी 2 लाख 20 हजार हेक्टर प्रदेशात उसाचे पिक घेतले जाते.  2 लाख 98 हजार हेक्टर प्रदेशातील पिके पावसावर अवलंबून आहेत. 43 हजार हेक्टर प्रदेशात डाळींचे तसेच 9112 हेक्टरवर इतर पिके घेतली जातात. 

2018- 18 मध्ये जिल्हातील 18,993 हेक्टरवर 3,67,335 मेट्रिक टन फळांचे उत्पादन घेण्यात आले आहे. जिल्ह्यात फळ उत्पादनाकडे अनेक शेतकरी वळू लागले असून फलोत्पादन खात्याने फळ उत्पादन शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधा देण्याबरोबरच शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे सरासरीपेक्षा अधिक फळांचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळु लागले असून 2016-17 ते 2018-19 मध्ये आतापर्यंत 1211 कोटीहून अधिक रकमेची फळे परदेशात पाठवून देण्यात आली आहेत.                

जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती असली तरी फळांच्या उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. दरवर्षी फळ उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे फळ उत्पादन अधिक प्रमाणात होत आहे. याचा लाभ फळ उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

- रवींद्र हकाटे,

संचालक, फलोत्पादन खाते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com