इटावा : विधानसभा निवडणुकीनंतर अखिलेश यादव राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर पुन्हा विराजमान होतील, असा विश्वास समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी आज व्यक्त केला.
पक्षामध्ये कोणताही बेबनाव नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुलायमसिंह यादव यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""अखिलेश सरकारच्या काळात अनेक विकासकामे मार्गी लागली असून, ही कामे पाहता जनता पुन्हा संधी देईल आणि अखिलेश पुन्हा मुख्यमंत्री होतील.''
निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांतील प्रचारात आपण सहभाही होणार असल्याची माहितीही मुलायमसिंह यांनी या वेळी दिली. या निवडणुकीत बंधू शिवपाल यादव यांचा मताधिक्याने विजय होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच मुलायमसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
एका प्रश्नास उत्तर देताना ते म्हणाले, "मोदींना जे बोलायचे आहे ते त्यांना बोलू द्या, उत्तर प्रदेशमधील जनतेने समाजवादी पक्षाला अगोदरपासूनच स्वीकारले आहे.''
|