Amritsar Rail Accident : चाळीस तासांनंतर रेल्वेसेवा सुरू 

Amritsar Rail Accident : चाळीस तासांनंतर रेल्वेसेवा सुरू 

नवी दिल्ली/अमृतसर : जोडा फाटक रावणदहनादरम्यान घडलेल्या रेल्वेदुर्घटनेने ठप्प झालेली रेल्वेसेवा आज चाळीस तासांनंतर सुरू झाली. रविवारी दुपारी साडेबारानंतर रेल्वेसेवा पूर्ववत झाल्याचे प्रवक्‍त्याने सांगितले. मनवाला ते अमृतसरदरम्यान दुपारी दोनच्या सुमारास मालगाडी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान, आंदोलनकर्त्यांनी सकाळी निदर्शने करत नवज्योत सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

जोडा फाटक येथे शुक्रवारी रात्री रावणदहनाचा कार्यक्रम पाहताना काही नागरिक रेल्वेरुळावर उभे राहिले. त्याचवेळी जालंधर-अमृतसर भरधाव रेल्वेच्या धडकेने 59 जणांचा मृत्यू झाला, तर 70 हून अधिक जखमी झाले. या घटनेने संतप्त नागरिकांनी रेल्वे वाहतूक बंद पाडली आणि रेल्वेमार्गावरच निदर्शने सुरू केली. त्यामुळे रेल्वेमार्गालगत जवान तैनात करण्यात आले होते. त्यानंतर खंडित झालेली रेल्वेसेवा रविवारी दुपारी सुरू झाली. तरीही 17 रेल्वे रद्द करण्यात आल्या असून सात रेल्वेचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तत्पूर्वी आज सकाळी आंदोलकांनी रेल्वेमार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. राज्य सरकारविरुद्ध घोषणाबाजी करताना दोषींवर कारवाई करणे, मृतांच्या नातेवाइकांना नुकसान भरपाई देणे या मागण्या करण्यात आल्या. 

पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिद्धू यांच्या राजीनाम्याचीही मागणी या वेळी आंदोलनकर्त्यांनी केली. परंतु सुरक्षा दलाने त्यांना मार्गावरून हुसकावण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने दगडफेक केली. या वेळी सुरक्षा दल आणि नागरिक यांच्यात धुमश्‍चक्री उडाली. आंदोलनाची तीव्रता पाहता पंजाब पोलिसांनी कमांडो, रॅपिड ऍक्‍शन फोर्सच्या तुकड्या तैनात केल्या होत्या. अपघातातील 59 मृतांपैकी 40 जणांची ओळख पटली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com